राहुरी -नागरिकांचा विरोध असतांनाही राहुरी नगरपालिकेने मालोजी कोरडे चौकात रस्त्यावर सिमेंट कॉंक्रिटचा दुभाजक केला आहे. मात्र दुभाजकाच्या उंची इतका रस्ताच नगरपालिकेने उचलून घेण्याचा विक्रम केला आहे.पालिकेच्या या कामगिरीची ग्रिनीज बुक रेकॉर्ड ने खरोखरच विशेष दखल घेतली पाहिजे.
पाण्याची टाकी ते महात्मा फुले चौक हा रस्ता पालिकेने सिमेंट क्रॉंकीटचा केला. दोन कोटीपेक्षाही अधिक निधी खर्च झाला.मात्र निधी कमी पडल्याचे कारण सांगत ठेकेदाराने काम अपेक्षेप्रमाणे पूर्ण केले नाही. दुभाजकाचे काम अर्धवट सोडले. आता दुभाजकाच्या खड्ड्यात अपघात होवू लागले. जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देवेंद्र लांबे यांनी तक्रारी केल्या. मग पालिकेला जाग आली. आता कुठे दुभाजक आहेत तर उर्वरीत दुभाजकाची जागा रस्त्यात समाविष्ट केली आहे. खरोखरच दूभाजकाची गरज होती काय हा प्रश्न उपस्थित होतो आहे. दुभाजक नाही तेथे अधिक रस्ता वाहतूक कोंडीवेळी उपलब्ध होवू शकतो.
या सिमेंट क्रॉंकीटच्या रस्त्याच्या बाजूला दक्षिणोत्तर रस्ता हा नव्या पेठेतील राहुरीतील एकमेव सर्वाधिक रुंद असणारा रस्ता होता. परंतु ठेकेदारांची त्या रस्त्याला दृष्ट लागली. सुशोभीकरणासाठी पालिकेने दुभाजक टाकून रस्ता अरुंद केला. पूर्वीच्या रुंद रस्त्यावर तीन किंवा चारचाकी वाहने सहजपणे जात होती. अशा रस्त्यावर आता जेमतेम दोन्ही बाजूला एकेकच चारचाकी वाहने कशीबशी जात आहेत. परिसरातील नागरिकांचा या दुभाजक टाकण्यास विरोध होता, परंतु पालिकेने त्या विरोधाची काहीही दखल घेतली नाही. दोन रस्त्याच्या उंचीतील फरकाने बरेच अपघात चौकात होवू लागले. आता तर पालिकेने या दुभाजकाच्या उंची इतकीच रस्त्याचीच उंची एका बाजूने वाढवली आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाची त्यामुळे मोठी चर्चा होत आहे.
मालोजी कोरडे चौकात आता पालिकेने आधी विरोध डावलून अडीच फूट उंचीचा सिमेंट कॉंक्रिटचे दुभाजक टाकले. त्यातून रस्त्याची उंची एकदम वाढल्याने होणारे अपघातांमुळे नागरिकांनी पालिकेकडे अनेक तक्रारी केल्या. त्याची दाखल घेत आता दुभाजकाच्या उंची इतका रस्ता पालिकेने एका बाजूने उचलून घेतला आहे. त्यामुळे पालिकेच्या बांधकाम विभागाची खरोखरच चर्चा होत आहे. राज्यातील कुठल्याही पालिकेत अशा पद्धतीने दुभाजकाच्या उंची इतका रस्ता कोणीही उचलून घेतलेला नसेल. खरोखरच या दुभाजकाची गरज होती का हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
ठिबक सिंचनाचे पाणी रस्त्यावर
या दुभाजकात लावलेल्या झाडांच्या व्यवस्थेसाठी ठिबक सिंचन व्यवस्था केली आहे. या ठिबकचे अतिरिक्त होणारे पाणी रस्त्यावरच येऊन त्याच ठिकाणी डांबरी रस्त्यांना मोठे खड्डे पडले आहेत. मात्र तरीही पालिका रोज ठिबक संचाने त्या झाडांना पाणी देत असते. पाणी वाचवाचा संदेश देणारी पालिका पाण्याचा अतिरिक्त वापर करून त्यामुळे तेथील रस्ते ही खराब होत आहेत मात्र पालिका त्याची काहीही दखल घेत नाही.