नवी दिल्ली – बिहारमधील सामाजिक न्यायासाठी महाआघाडी लढा सुरूच ठेवेल. त्यासाठी आम्हाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांची बिल्कूल गरज नाही, अशी परखड भूमिका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी मांडली.
बिहारमधील महाआघाडीची साथ सोडून नितीश यांनी पुन्हा भाजपशी मैत्री केली. महाआघाडीमधील घटक पक्षांचा समावेश विरोधी पक्षांच्या इंडिया या देशव्यापी आघाडीतही आहे. त्यामुळे नितीश यांचा निर्णय महाआघाडीप्रमाणेच इंडियासाठीही मोठा हादरा ठरला. त्या पार्श्वभूमीवर, बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील सभेत बोलताना राहुल यांनी नितीश यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला.
थोड्याशा दबावानंतरही नितीश घूमजाव करतात, अशी टिप्पणी त्यांनी केली. बिहारमधील महाआघाडीत कॉंग्रेस, राजद आणि डाव्या पक्षांचा समावेश आहे. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना कॉंग्रेसने सभेचे निमंत्रण दिले होते.
मात्र, लालूंची सोमवारी ईडीने चौकशी केली. तर, त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांची मंगळवारी चौकशी करण्यात आली. त्यामुळे ते पिता-पुत्र कॉंग्रेसच्या सभेला उपस्थित राहू शकले नसल्याचे समजते. डाव्या पक्षांच्या वतीने दिपांकर भट्टाचार्य सभेला उपस्थित राहिले. राहुल यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा सध्या बिहारमधून मार्गक्रमण करत आहे.