पुणे- प्रतिभावंत साहित्यिकाला प्रतिमेत बंदिस्त करण्याच्या मानसिकतेमुळे साहित्यिकाने हाताळलेले इतर प्रकार दुर्लक्षित राहतात. साहित्यिकाच्या वैचारिक प्रवासाकडे पाहण्याची दृष्टी निकोप दिसत नाही. राजकारणाचा सामान्यांना वीट आलेला आहे. या काळात साहित्यिकांनीच समाजाला बळ देण्यासाठी पुढे आले पाहिजे. साहित्य व्यवस्था संकुचित होत चालली आहे. समकालीन लेखक काय लिहितात हे इतर लेखकांना माहीत नसते तर दुसरीकडे समीक्षेचे अध:पतन होत आहे. समीक्षेनेदेखील भारत सासणे यांच्या समीक्षेकडे दुर्लक्ष केले, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था आणि अक्षरभारतीच्या वतीने 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांच्या समग्र साहित्यावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे शिरीष चिटणीस, अक्षरभारती पुणेचे अध्यक्ष माधव राजगुरू, प्रा. विश्वास वसेकर आदी उपस्थित होते.
सासणे लिहीते झाले त्यावेळी कथाकारांनी लघुकथा लेखन सोडले होते. मात्र सासणे यांनी त्या काळातही लघुकथा लेखन सुरू ठेवले. पुढच्या पिढीतील कथाकारांसाठी लघुकथा लेखनाची वाट प्रशस्त करून दिली. मुलांसाठी पहिल्या प्रतीच्या लेखकाने लिखाण केले पाहिजे. यामुळे बालकांनादेखील पहिल्या प्रतीचे लेखन वाचता येईल, असे ठाले-पाटील म्हणाले. चर्चासत्राची प्रस्तावना आणि स्वागत शिरीष चिटणीस यांनी केले. माधव राजगुरू यांनीआभार मानले.
लेखन करतानाचा प्रवास हा एकट्याचा होता, कोणत्याही गटात समाविष्ट झालो नाही. माझ्या मते कोणताही लेखक हा नेहमी एकटाच असतो. समूहवादी लेखक काळाच्या पटावर स्वत:ची मुद्रा उमटवू शकले नाहीत. गटबाजी लेखकाला हानिकारक असते. लेखकाला सर्वसामान्यांबद्दल आस्था वाटते, यातून लेखकाकडून उत्तम लेखन निर्मिती होते. लेखकाने विश्वबंधुत्व स्वीकारून भाषिकबंधने तोडून लेखन करावे.- भारत सासणे, ज्येष्ठ लेखक