पुणे – रेवदंडा येथील “डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान’तर्फे पुणे महापालिकेच्या सहकार्याने रविवारी शहरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यात विशेषत्त्वाने स्मशानभूमी, कब्रस्तान आणि दफनभूमीमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. पुणे शहर आणि ग्रामीण परिसरातील एकूण 37 स्मशानभूमी, 12 कब्रस्तान आणि एक ख्रिश्चन दफनभूमी असे सुमारे पाच लाख एक हजार 133 चौ.मीटर परिसर स्वच्छ करण्यात आला. यामध्ये सुमारे 4 हजार 96 सदस्यांचा सहभाग होता आणि सुमारे 211 टन कचरा टन कचरा गोळा करण्यात आला अशी माहिती धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली.
कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीबरोबरच टायफॉइड, मलेरिया, गॅस्ट्रो, कॉलरा असे आजार पसरतात. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्याला आणि सरकारला मोठा खर्च करावा लागतो. अस्वच्छ वातावरणामुळे परिसरात प्रदूषण होते. अशा अस्वच्छतेमुळे आपल्या गावाला किंवा शहराला कचऱ्याचे शहर किंवा गाव असे संबोधले जाऊ शकते. हे सर्व टाळण्यासाठी जमा होणारा कचरा निर्धारित केलेल्या जागी नेऊन टाकला पाहिजे. ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले पाहिजे, असे डॉ. धर्माधिकारी म्हणाले.
प्लॅस्टिकचा कमीतकमी वापर केला पाहिजे. संपूर्ण समाज हे एक मोठे कुटुंब आहे आणि या कुटुंबचा मी एक सदस्य आहे, या भावनेतून स्वच्छता राखणे हे माझे सामाजिक कर्तव्य आहे असे प्रत्येकाने मानले पाहिजे आणि त्याप्रमाणे कृती केली पाहिजे, असेही आवाहन डॉ. धर्माधिकारी यांनी केले.