पुणे, दि. 30 – खडकवासला प्रकल्प आणि भामा आसखेड धरणांतून पुणेकरांना पिण्यासाठी पाणी मिळत आहे. मात्र, आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांचा विस्तार होत आहे. त्यामुळे मुळशी धरणातून 5 टीएमसी मंजूर केले पाहिजे व मिळाले पाहिजे. त्यातून शेतकऱ्यांचा रोष राहणार नाही आणि पुणेकरांचा समाधान होईल, असा प्रस्ताव विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य शासनाकडे ठेवला आहे.
अजित पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यापूर्वी आम्ही मुळशी धरणातून पुणेकरांना पिण्यासाठी पाणी मिळण्यासाठी समिती नेमली होती. त्याचा अहवाल, अडचणी, लवादाचा प्रश्न या सर्व गोष्टींचा विचार करून मुळशी धरणातील पाणी मिळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
दसऱ्या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील पहिले कोणाचं भाषण तुम्ही ऐकणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवारांनी “उद्धव ठाकरेंचं भाषण पहिल्यांदा ऐकू आणि मग एकनाथरावांचं’ असे म्हणाले. मेळावा मोठा करण्याचा अधिकार प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आहे. दोन्हीही गट इतरांना त्रास होणार नाही आणि नियमांचे पालन करून मेळावा करतील अशी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तारावरून पवार म्हणाले, “कुणाला खुश करायचे आणि कोणाला नाराज ठेवायच हा त्यांचा अधिकार असून, त्यामध्ये आम्ही नाक खुपसण्याच काम नाही. काही महिने शिंदे आणि फडणवीस हे दोघेच सर्व काम पाहात होते. आता कुठे 20 जण झाले आणि पालकमंत्री नेमले आहेत. त्यामुळे त्यांना ज्यावेळी योग्य वाटेल तेव्हा मंत्रिमंडळ विस्तार करतील.’
“वारंवार पाणी साचण्याचा प्रश्न,महापालिकने सर्व्हे करून सोडवावा’
पुण्यात मुसळधार पावसामुळे वारंवार पाणी साचत आहे. त्याचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागत आहे. त्याबाबत अजित पवार म्हणाले, “पुणे महापालिका प्रशासनाने चांगली एजन्सी नेमून सर्व्हे करावा. स्ट्रॉम वॉटरचा विचार करावा लागेल. त्यादृष्टीने भविष्याचा वेध घेत उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. महापालिकेवर प्रशासक असले तरी राज्याचे नियंत्रण असते. आता केंद्र व राज्यात त्यांची सत्ता आहे. मुसळधार पावसामुळे पुणे जलमय होण्याचा कायमचा प्रश्न सोडवावा.’