पुणे – शहरात अंत्यविधीसाठी सर्वाधिक वापर होत असलेल्या नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीतील अंत्यविधीनंतर होणारे वायूप्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजना कौतुकास्पद असल्याचे सांगत प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेस दिलासा दिला आहे, अशी माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी दिली.
स्मशानभूमीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी स्मशानभूमी परिसरातील नागरिकांकडून सातत्याने करण्यात येतात. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने प्रदूषण कमी करण्यासाठी मागील काही वर्षांमध्ये याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आधुनिक यंत्रणेचा वापर केला आहे. त्यानंतरही धुराचे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांकडून केल्या जात आहेत.
या तक्रारींच्या अनुषंगाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक विद्यानंद मोटघरे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल आणि तक्रारदार नागरिकांची नुकतीच ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विद्यानंद मोटघरे यांनी पालिकेच्या कामाचे कौतुक केले असल्याचे मुख्य अभियंता कंदुल यांनी सांगितले.