पुणे – मराठा समाजाला आरक्षण द्यावे, जालना येथील आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या दोषी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर करवाई व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे आज (दि. 14) हुतात्मा बाबू गेनू चौकात लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब आमराळे, राजेंद्र कुंजीर, अमर पवार, राजेंद्र कोंढरे, गुलाबराव गायकवाड, तुषार काकडे, युवराज दिसले, सचिन वडघुले, गणेश मापारी, नाना निवगुणे, सचिन आडेकर, रेखा कोंडे, मिलन पवार, श्रुतिक पाडाळे, संदीप लहाने, अनिकेत भगत, राकेश रेपाळे, विराज तावरे यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन भाषणे केली.
यावेळी एक मराठा लाख मराठा…तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवाजी…आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे…असा घोषणा देत मराठा समाजाने विविध मागण्या केल्या. मनोज जरांगे यांनी जालना येथे पुकारलेल्या आंदोलनाला यावेळी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणात पाठिंबा दिला. न्यायालयात टिकेल अशा पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे.
जरांगे यांनी केलेल्या मागण्यांविषयी राज्य सरकारने सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा. पुढील 1 महिन्यात योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, सकाळी दहा वाजता दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. तर दुपारी 2 वाजता श्रावणी मेमाणे या मुलीकडून सरबत पिऊन उपोषण सोडण्यात आले.