खडकवासला (वार्ताहर) – पुणे – पानशेत रस्त्यावरील मणेरवाडी (ता. हवेली) येथील पुलाचे काम सध्या अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी पर्यायी रस्ता करण्यात आला होता. परंतु हा रस्ता बुधवारी (दि. 13) झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला. तर सोनापूर येथील रस्ता खचला आहे. त्यामुळे खानापूर गावासह परिसरातील 30 ते 35 वाड्या-वस्त्यांचे दळण-वळण ठप्प झाले आहे.
हायब्रीड ऍन्युईटी योजनेतून पुणे – पानशेत रस्त्याचे काम 2019 मध्ये सुरू करण्यात आले होते. त्यासाठी 202 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाला जवळपास चार वर्षे पूर्ण झाली, तरी या रस्त्याचे आणि रस्त्यावरील पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. याचा फटका परिसरातील नागरिकांना आणि पर्यटकांना बसत आहे. तरीही संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
खानापूर गावाजवळ सिंहगड आणि मणेरवाडीच्या डोंगरदऱ्यातून वाहत येणाऱ्या पाण्यामुळे ओढ्यावरील पुलाचे काम उन्हाळ्यात सुरू करण्यात आले होते. परंतु, संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या अर्धवट कामामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कामाबाबत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
“मणेरवाडी ओढ्यावरील पूल व सोनापूर हद्दीतील नागरिकांना पावसामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी व शेतकरी वर्गाला मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील समस्या कायमस्वरुपी मिटवायची असेल तर त्वरीत मणेरवाडी येथील पुलाचे व सोनापूर हद्दीतील खचलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची गरज आहे.”
– नवनाथ पारगे, माजी सदस्य, जिल्हा परिषद, पुणे
“खानापूर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पर्यायी वाहतुकीसाठी केलेल्या पुलावरून बुधवारी दुपारी पाणी वाहत होते. त्यामुळे काही काळासाठी रस्ता बंद करण्यात आला होता. मुख्य पुलाचे काम पूर्ण झाले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूच्या भरावाचे काम सध्या सुरू आहे ते पूर्ण झाल्यावर पुलावरून वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.”
– अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग