मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील मुसळधार पाऊस सुरू असून, कुशिरे बुद्रुक ते कोंढरे रस्ता कुशिरे बुद्रुक येथे खचल्याने 11 गावांचा संपर्क बुधवारी (दि. 13) दुपारी संपर्क तुटला आहे. सुदैवाने वर्दळ नसल्याने कोणतीही दुर्घटना झाली नाही.
भीमाशंकर, आहुपे, पाटण खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे ओढे-नाले तुंडुब भरून वाहत आहे. अनेक रस्त्यांवर पाणी वाहत आहे. चळदार पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे ही मुश्किल झाले आहे. घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. कुशिरे ते कोंढरे हा रस्ता पाटण ते आहुपे असा जोड मध्यवर्ती रस्ता असल्याने तळेघर, फळोदे, पिंपरी, पाटण, म्हाळुंगे तर्फे आंबेगाव, कुशिरे बुद्रुक, कुशिरे खुर्द, भोईरवाडी, कोंढरे, तिरपाड, आहुपे या गावांना दळण- वळणासाठी उपयुक्त होता.आत्ता या गावांचे दळण-वळण तळेघर येथील बाजारपेठेत जाण्यासाठी बंद झाले आहे.
हा रस्ता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने काही वर्षांपूर्वी केला होता. संबधित रस्त्यावरील मोरी बांधकाम हे मातीवरच करण्यात आले होते. याला स्थानिक लोकांनी विरोधही केला होता; पंरतु त्यांचे म्हणणे ऐकून न घेता ठेकेदार व अधिकारी यांनी मनमानी करत काम तसेच केले होते. गेल्या वर्षी ही रस्ता खचून 1 मोरी तुटली होती. यांची ग्रामपंचायत व ग्रामस्थानी लेखी व तोंडी तक्रार संबधित विभाग व तातकालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती.
या गोष्टीकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने कानाडोळा केल्याने पुन्हा रस्त्याचा काही भाग वाहून जाऊन नुकसान झाले आहे. कुशिरे बुद्रुक रस्ता वाहतुकीस सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आला आहे. निधी उपलब्ध होईपर्यंत रस्ता वाहतुकीस बंद राहणार असल्याचे आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सांगितले.
कुशिरे बुद्रुक (ता. आंबेगाव) ः येथे रस्ता खचून तुटल्याने 11 गांवाचा संपर्क तुटला आहे.