पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- स्वामी गोविंद गिरी महाराजांचे अंतःकरण खूप विशाल आहे. राजकीय नेत्यांनी त्यांच्याकडून कसे बोलायचे हे शिकण्यासारखे आहे. कोविड काळातील त्यांची प्रवचने नागरिकांना नव चैतन्य निर्माण करणारी ठरली. पूर्वीच्या संतांनी जे काम केले त्याचा समृद्ध वारसा आज स्वामी गोविंदगिरी महाराज चालवत आहेत. असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आळंदी येथे आयोजित गीताभक्ती संमेलनात सहभागी झाले असता, त्या बोलत होत्या. यावेळी पूज्यश्री शंकराचार्य महाराज, पुज्य श्री आनंदमूर्ती गुरु माँ, श्री पुष्पपेंद्र कुलश्रेष्टी, पूज्य श्री जितेंद्रनाथ महाराज, महंत डॉ. राहुल बोधी, पदश्री दादा विधाते, भरत आनंद महाराज, स्वामी विजयेंद्र सरस्वती उपस्थित होते. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी महाराजांना वाढदिवसानिमित्त शाल व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास भेट देऊन श्री माउलींच्या समाधीचे दर्शन घेतले. आळंदी देवस्थान आणि परिसराचा आढावा घेतला.