पुणे – यंदा मान्सून कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पाण्याचे संकट निर्माण होण्याची भीती आहे. त्यावर पर्यायी जलस्रोतांचे सर्वेक्षण करून अहवाल द्यावा लागणार आहे. पण, हे सर्वेक्षण कोणी करायचे यावरून मनपा पाणीपुरवठा आणि पर्यावरण विभागात जुंपली आहे.
राज्यात कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा 31 ऑगस्टपर्यंत राखीव करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे बांधकाम, वाहने धुणे, स्वच्छतागृहे तसेच इतर अनावश्यक कारणांसाठी वापरले जाणारे पिण्याचे पाणी कमी करून बोअरवेल, विहिरी तसेच इतर स्रोतांद्वारे पाणी द्यावे लागेल. त्यामुळे जलस्रोतांचे सर्वेक्षण करून त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.
पाणीपुरवठा विभागाची भूमिका
महापालिकेने 2015 मध्ये असेच सर्वेक्षण केले होते. आता गावांच्या समावेशाने हद्द दुप्पट वाढली आहे. त्यामुळे या भागांतही जलस्रोत सर्वेक्षणही करावे लागणार आहे. हे काम पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने करणे अपेक्षित आहे. मात्र, जलशक्ती अभियानांतर्गत भूजल तसेच इतर सर्वेक्षणाच्या सूचना मनपा पर्यावरण विभागास करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने या अभियानात हे सर्वेक्षण समाविष्ट करण्याचा घाट घातला आहे.
पर्यावरण विभागाची भूमिका…
“या सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध करणे, आयुक्तांची मान्यता घेणे, सर्वेक्षणासाठी निविदा काढणे, संस्था नेमणे, सर्वेक्षण करून अहवाल तयार करणे यासाठी तीन ते चार महिने लागणार आहेत,’ असे पाणीपुरवठा विभागामार्फत सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे काम पुढील महिन्यात जरी झाले तरी ते पूर्ण होण्यास ऑक्टोबर उजाडणार आहे. असल्याने आयत्यावेळी महापालिकेस पाणी नियोजनाची धावपळ करावी लागण्याची शक्यता आहे.
पर्यावरण विभाग जलस्रोत सर्वेक्षण करणार आहे. याच कामात त्यांना बोअरवेल व विहिरींचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर शासनास अहवाल सादर केला जाईल. आमचा विभाग हे काम करणार नाही.
– अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, मनपा
आम्ही जलशक्ती विभागाच्या प्रकल्पासाठी सर्वेक्षण करत आहोत. या कामासाठी तीन ते चार महिने लागणार आहे. दुष्काळी स्थितीत पाणी नियोजनासाठी आमचे सर्वेक्षण नसेल. हे सर्वेक्षण पाणीपुरवठा विभागाने त्यांच्या पातळीवर करणे अपेक्षित आहे.
– माधव जगताप, उपायुक्त, पर्यावरण विभाग