पुणे -राज्यशासनाच्या आदेशानुसार, महापालिकेतून उरूळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन्ही गावे महापालिका क्षेत्रातून वगळण्याचा ठराव मंजूर करून शासनास पाठविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी स्पष्ट केले. तसेच लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याबाबत शासनाचे आदेश नसून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावांबाबत घेतलेल्या बैठकीच्या इतिवृत्तात गावांबाबतचा ठराव करण्याचे निर्देश आहेत. हे इतिवृत्त नुकतेच महापालिकेस प्राप्त झाले असून त्यानुसार ही कार्यवाही केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
उरूळी देवाची आणि फुरसुंगी या दोन्ही गावांचा 2017 मध्ये महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आला होता. त्यानंतर या गावांना महापालिकेने आकारलेला कर जास्त असल्याने तसेच महापालिकेकडून कोणत्याही सोयी सुविधा मिळत नसल्याने, या गावांनी महापालिकेतून वगळण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री शिंदे यांनीही त्याबाबत घोषणा केली होती. मात्र, शासनाकडून त्याबाबत अद्याप कोणतेही आदेश काढण्यात आलेले नाहीत. मात्र, ही गावे महापालिकेने केलेल्या ठरावानुसार शासनाच्या आदेशानेच पालिकेत आलेली असल्याने ती वगळण्यासाठी महापालिकेस पुन्हा तसा ठराव करून शासनास पाठवावा लागणार आहे. त्याबाबतचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीच्या इतिवृत्तात आहे. त्यानुसार, महापालिकेस हे इतिवृत्त प्राप्त झाले असून त्यानुसार ठराव करणे पालिकेस बंधनकारक आहे. मात्र, महापालिकेने या गावांमध्ये आता पर्यंत सुमारे 300 कोटींचा खर्च केला असून त्याठिकाणी 2 नगररचना योजनाही प्रस्तावित केल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन सकारात्मक नव्हते. मात्र, हे शासनाचे आदेश असल्याने त्याची अंमलबजावणी महापालिकेस करणे बंधनकारक असून त्यानुसार लवकरच ठराव मान्य करून पाठविण्यात येणार असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले.
=