पुणे – सातबारा उताऱ्यावरील वारस नोंद करणे, मयताचे नाव कमी करणे, बोजा दाखल करणे अथवा कमी करणे या फेरफार विषयक सेवा आॉनलाइन पध्दतीने ई-हक्क प्रणालीद्वारे शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधेचा लाभ नागरिकांना महा ई सेवा केंद्र, सेतू केंद्रातून घेता येत आहे. त्यामुळे या सुविधेसाठी नागरिकांना आता तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
या सुविधा आता आॉनलाइन…
सातबारा उतारे आता डिजिटल स्वाक्षरीत उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच सातबारा उताऱ्यावर फेरफार घेण्याची प्रक्रिया संगणकीकृत करण्यात आली आहे. अनोंदणीकृत दस्ताचे फेरफार म्हणजे सातबारा उताऱ्यारवील वारस नोंद करणे, मयताचे नाव कमी करणे, बोजा दाखल करणे, अथवा कमी करणे, अपाक शेरा कमी करणे, विश्वस्थांचे नाव बदलणेआदी फेरफार नोंदविण्यासाठी खातेदार नागरिकांना महाभूमि या संकेतस्थळावरील ई हक्क प्रणालीमध्ये आॉनललाइन अर्ज करावा लागणार आहे.
महा ई सेवा केंद्रासाठी दर निश्चित
या सुविधेसाठी तसेच सातबारा उतारा आणि आठ अ ची प्रत काढणे यासाठी नागरिकांकडून किती दर आकारायचा हे निश्चित नव्हते, अखेर शासनाने या सुविधेसाठी दर निश्चित केले असून त्यानुसार 25 रुपये असा दर निश्चित केला आहे. अर्जाची कागदपत्रे दोन पेक्षा जास्त पाने असेल तर प्रति पान दोन रुपये याप्रमाणे दर आकारावेत, असे आदेश शासनाने दिले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे महा ईसेवा केंद्र अथवा सेतू केंद्रातून जादा शुल्क आकारण्याच्या प्रकारांना आळा बसणार आहे.