पुणे – वरुणराजाचे आगमन यंदा उशिरा झाले. त्यामुळे जून महिन्यात सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. मात्र, जुलै महिन्यात अवघे पंधरा दिवस झालेल्या पावसाने ही तफावत भरून काढत पुणे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी तीन तालुक्यांत सरासरीच्या शंभर टक्केहून अधिक पाऊस झाला. दोन तालुक्यात शंभर टक्के तर अन्य 9 तालुक्यांत सरासरीच्या 50 ते 80 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. मात्र, मावळ वगळता अन्य भागात सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतीचे कामे खोळंबली. हवेली, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर, सासवड, बारामती या तालुक्यात सरासरीच्या 40 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. जुलै उजाडला तरी पहिले दोन आठवडे पावसाने दडी मारली. मात्र, 15 जुलैनंतर पावसाने धुव्वाधार बरसत अवघ्या पंधरा दिवसांत तफावत भरून काढली.
बहुतांश छोटी धरणे शंभर टक्के, तर मोठी धरणे पन्नास टक्क्यांहून अधिक भरल्याने पाण्याची टंचाई दूर झाली. जुलैमध्ये मुळशी, शिरूर तालुक्यांत सरासरीच्या शंभर टक्के तर भोर, वेल्हे, खेड-राजगुरूनगर, आंबेगाव, इंदापूर आणि दौंड तालुक्यात सरासरीच्या शंभर टक्क्यांपेक्षा अधिक 112 ते 141 टक्के पाऊस झाला. तर मावळ तालुक्यात सर्वाधिक सरासरीच्या 210 टक्के पाऊस झाला.
- जिल्ह्यातील
पाच तालुक्यांत शंभर टक्के पाऊस - 9 तालुक्यांत
पन्नास टक्केच पावसाची नोंद
पिण्याच्या पाण्याचीही चिंता झाली कमी…
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची टंचाई होती. मात्र, 15 जुलैनंतर जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसामुळे विशेषत: धरणक्षेत्र आणि घाटमाथ्यावरील मुसळधार पावसाने छोटी-मोठी धरणे भरू लागली. त्यामुळे पाण्याची टंचाई कमी झाली असून, जुलै अखेर खडकवासला धरण शंभर टक्के भरले असून, पवना धरण 84 टक्के भरले आहे. टेमघर, भाटघर आणि गुंजवनी ही धरणे 56 ते 66 टक्के भरली असून, अन्य कासारसाई, मुळशी, वरसगाव, पानशेत, निरा देवघर, वीर, नाझरे ही धरणे 70 ते 89 टक्के भरली आहेत.