राजगुरूनगर -खेड तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शुक्रवारी (दि. 2) शेवटच्या दिवशी 193 जागांसाठी 594 उमेदवारांनी 596 नामनिर्देशन पत्र दाखल झाली. सरपंचपदाच्या 23 जागांसाठी 131 जणांनी 131 अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ वैशाली वाघमारे, नायब तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली. दरम्यान, शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यास गर्दी उसळी होती.
तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच सदस्य निवडणुकीचे उमेदवारी अर्ज येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात स्वीकारण्यात येत होते. 23 गावांतील निवडणुक रिगंणातील सरपंच, सदस्य उमेदवारांसह त्यांचे पॅनलप्रमुख, गावपुढारी, समर्थकांनी सकाळी 11 वाजल्यापासून येथे मोठी गर्दी केली होती.
गुरुवारी (दि. 1) एका गावातील सरपंचपदाच्या इच्छुक महिला उमेदवारांला नामनिर्देशन पत्र दाखल करताना दमबाजी झाल्याने त्याची निवडणूक व पोलीस प्रशासनाने दखल घेत याठिकाणी पोलीस यंत्रणा लावण्यात आली होती. शेवटच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडु नये. यासाठी महसूल व पोलीस यंत्रणा सतर्क होती.
अर्ज भरणे स्थळी तालुका क्रीडा संकुलामध्ये प्रांत विक्रांत चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटिल यांनी स्वतः उपस्थितीत राहुन संपूर्ण आढावा घेत ठाण मांडुन राहिले. पोलिस निरीक्षक विजयसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठिवल्याने गर्दीवर नियत्रंण राहिले. निवडणूक केंद्रात नामनिर्देशन दाखल करणाऱ्या उमेदवार आणि दोन व्यक्तींना आत प्रवेश देणे बंधनकारक केल्याने गर्दी नियंत्रणात राहिली. तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला व सूचना केल्या. नायब तहसीलदार संजय शिंदे यांनी दिवसभर सर्व प्रशासकीय यंत्रणेवर देखरेख केली.
बुधवारपर्यंत अर्ज माघारी
ग्रामपंचायतीच्या दाखल नामनिर्देशन पत्राची छाननी सोमवारी (दि. 5), नामनिर्देशन पत्रे माघारीची मुदत बुधवारी (दि. 7) दुपारी 3 वाजेपर्यंत नंतर उमेदवारांना निवडणुक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. मतदान रविवारी (दि. 18) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आहे. मतमोजणी मंगळवारी (दि. 20) राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू तालुका क्रीडा संकुलात सकाळी 9 वाजता सुरुवात होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी दिली.
बिनविरोधचा मानस
शिरोली ग्रामपंचायतीच्या दोन उमेदवारांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र यावेळी विविध प्रभागात अर्ज दाखल न करता उमेदवारांनी दोन स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले नसल्याचे पहावयास मिळाले. यामध्ये देवोशी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे लोकनियुक्त सरपंचपद बिनविरोध निवडीच्या मार्गावर आहे. तर तीन प्रभागातील सात जागांसाठी अवघे 11 नामनिर्देशन पत्रे दाखल होऊन काही जागावर एकच नामनिर्देशन पत्र आल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा मानस ग्रामस्थांनी व्यक्त केला.
ऑफलाइन अर्ज स्वीकारले
निवडणुकीतील उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सर्व्हर डाऊनमुळे ऑनलाइन दाखल करण्यासाठी सुरुवातीला अडचणी आल्या होत्या रात्रीचा दिवस करुनही नामनिर्देशन पत्र ऑनलाइन अपलोड होत नसल्याने उमेदवारांमध्ये नाराजी होती धाकधूक होती; मात्र यावर सरकारने निर्णय घेत ऑफलाइन अर्ज भरण्याची मुभा दिल्याने दोन दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी उसळली होती.