राजगुरूनगर-जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून शुक्रवारी (दि.16) प्रचाराची सांगता झाली. दरम्यान, या निवडणुकीच्या प्रचारासाठी पारंपरिक साधने वापरली जात असली तरी, यंदा सोशल मीडियाचा खास करून व्हॉट्सऍपचा वापर लक्षणीयरीत्या वाढलेला दिसतो. उमेदवारांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण व्हॉट्सऍप, फेसबुक, इंस्टाग्राम आदी सोशल मीडियारून प्रचारावर जास्त भर देत आहेत.
\2014च्या लोकसभा निवडणुकीपासून सोशल मीडियाचा वापर वाढलेला असून, 2019 ची निवडणूक तर आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हॉट्सऍप निवडणूक म्हणून ओळखली गेली. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था करत सोशल मीडीयाचे लोण आता ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचले आहे.
राजकीय जाहिरातीसाठी व्हॉट्सऍप, टेलिग्रामसारखे मॅसेंजर ऍप महत्त्वाचे ठरत आहे. तसेच थेट जनतेतून सरपंच निवडणूक असल्यामुळे या केंद्रीय प्रचाराला धार आली आहे. उमेदवार समर्थक कार्यकर्ते दररोज सकाळी आपल्या व्हॉट्सऍप स्टेट्ससाठी चिन्हे, आघाडीचे पोस्ट, व्हिडिओ, फोटो, झीप फाइलचा वापर करतात. त्याचप्रमाणे कोण-कोणाची व्हॉट्सऍप स्टेटस ठेवतो, यावरूनदेखील कोण-कोणासोबत आहे, याचा अंदाज घेतला जात आहे.
ग्रामपंचायत निवडणूक झाली डिजिटल
पूर्वीप्रमाणे प्रचार फेरी, बैठका, सभादेखील होत आहेत. आता त्या फेरीचे व्हिडिओ, फोटो, सभांमधील भाषणे, टीका स्टेटसला ठेऊन, ग्रुपमध्ये पाठवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वॉर्ड निहाय मतदारांचे ग्रुप, उमेदवार, आघाड्यांच्या नेत्यांचे ग्रुप, महिला मंडळाचे ग्रुप, समाज व संघटनानिहाय ग्रुप अशा माध्यमातून ही निवडणूक व्हॉट्सऍपमय झाली आहे. सध्या टेक्स्ट फोटो, व्हिडिओच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ही निवडणूक यंदा जास्तच डीजीटल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
स्थानिक नेत्यांची अग्निपरीक्षा
ग्रामपंचायत उमेदवारांना प्रचारासाठी दहा दिवसांचा कालावधी मिळाला होता. हिवाळ्याच्या थंडीत ही निवडणूक होत असली तरी गावगाड्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार असल्याने गावपुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजकीय पक्षांनीही गावात आपले प्रस्थ दाखविण्यासाठी इच्छुकांना दावेदारी दिली आहे.