राजगुरूनगर -राजगुरुनगर पासून पाच ते सहा किलोमीटर अंतर असलेल्या जैदवाडीच्या बुट्टे वस्तीमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा वीज खांब व त्यावर दिवे बसवण्यात येऊन विजेचा झगमगाट झाल्याने जाण्यायेण्यासाठी रात्री अपरात्री अंधारात ग्रासमथांवर येणारी संकटे दूर झाली आहेत.
जैदवाडी गावाची लोकसंख्या जेमतेम शंभर; मात्र या गावातील विस्तार बुट्टेवाडीपर्यंत गेला असून जवळपास सातशे ते आठशे लोकसंख्या बुट्टेवाडी परिसरात झाली आहे. तेथे घराघरात वीज पोहचली; मात्र अडगळीतून शेतातून जाणारे रस्ते अंधारात होते. गेली अनेक वर्षे बुट्टेवाडी व जैदवाडीत जाणाऱ्या रस्तावर अंधारात मार्ग काढत ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी यांना जावे लागत होते. चोहोकडून डोंगर आणि झाडी व शेती असल्याने या रस्स्त्याने जाणे म्हणजे जीव धोक्यात घालून जाणे अशी परिस्थिती आहे.
सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत या रस्त्यावरून जाताना नागरिकांना सरपटणारे प्राणी, बिबट्या, तरस, कोल्हे, लांडगे आदी हिंस्र प्राण्याच्या व भुरट्या चोरट्यांच्या भीतीच्या दबावात जावे लागत होते. गेली 25 ते 30 वर्षे या रस्त्यावर विजेचे खांब उभे करण्यासाठी व त्यावर दिवे लावण्यासाठी ग्रामस्थ मागणी करीत होते; मात्र त्यांच्या या मागणीकडे स्थानिक नेते आणि वीज वितरण कंपंनीच्या अधिकाऱ्यांनी फारसे लक्ष दिले नव्हतं.
जैदवाडी बुट्टेवाडी रस्त्यावर विजेचे खांब व त्यावर दिवे बसविण्याची मागणी प्रलंबित होती. मागील जिल्हा परिषद व खेड पंचायत समितीची निवडणूक होती. त्यावेळी ग्रामस्थांचे प्रश्न समजून या निवडणुकीतील उमेदवार सुनीता सांडभोर यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत या रस्त्यावर विजेचे खांब आणि त्यावर विजेचे दिवे बसविण्यासाबाबत ग्रामस्थांना शब्द दिला होता. सुनीता सांडभोर या निवडून आल्यानंतर त्यांनी याबाबत वीज वितरण कंपनी तत्कालीन आमदार सुरेश गोरे, विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे सततचा पाठपुरावा सुरू ठेवला.
3 वर्षांपूर्वी बुट्टेवाडी -जैदवाडी रस्त्यावरील विजेच्या खांबासाठी 100 खांबाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला व त्याचा पाठपुरावा पं. स. सदस्या सुनीता सांडभोर, संतोष सांडभोर यांनी सुरु ठेवला. जैदवाडीच्या सरपंच शीतल जैद, उपसरपंच सुखदेव शिंदे, केतन जैद, सविता गावडे, नंदा जैद सिमा शिंदे यासह गावातील ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले. जिल्हा नियोजन समितीकडून या प्रस्तावाला प्राधान्य देत 12 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन या रस्त्यावर 87 विजेचे खांब बसविण्यात आले. त्यावरील लाईट जोडून या रस्त्यावर नुकताच वीज पुरवठा सुरु केल्याने रस्त्यावर झगमगाट झाला आहे.