पुण्यात पत्रकार परिषद घेत ऍड. पलांडे व सहकाऱ्यांचा आरोप ः वार्षिक सभेत जाब विचारणार
पुणे – न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोक पवार यांच्या एककल्ली कारभारामुळे चांगल्या स्थितीत असणारा साखर कारखाना आज अडचणीत आला आहे. कारखान्याचा परिसर संपूर्ण उसक्षेत्राचा असूनही गाळप हंगाम दिवसेंदिवस कमी होत असून, गेल्या वर्षी 21 कोटींचा तोटा झाला आहे.
कामगारांचे पगार गेल्या सात महिन्यांपासून थकले आहेत. यंदाचे ऊस गाळप काही दिवसांवर आले असतानाही बॉयलर, मशिनरी दुरुस्ती अजूनही झालेली नाही. नातेवाईकांच्या नावाने खासगी कारखाना काढून तो नफ्यात आणण्याने, भ्रष्ट व एककल्ली कारभार करण्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वाचा असलेला हा कारखाना अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची गळचेपी थांबवण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत जाब विचारणार आहोत, असा आरोप माजी संचालक ऍड. सुरेश पलांडे व सहकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.
पुणे शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी ज्येष्ठ संचालक पांडुरंग थोरात, माजी व्हाइस चेअरमन दादापाटील फराटे, शिवसेना तालुका प्रमुख सुधीर फराटे, मांडवगण विकास सोसायटी चेअरमन गोविंद फराटे, सुरेश थोरात, सरपंच रमेश पलांडे, पांडूरंग दुर्गे, तुषार जांभळे, ऍड. धैर्यशील पलांडे, ऍड. सौरभ पलांडे, ऍड. यश पलांडे आदी उपस्थित होते.
ऍड. पलांडे म्हणाले, शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादन 30-35 लाख मे. टन इतके आहे. तथापि, घोडगंगा साखर कारखान्याने अवघे 6 लाख 30 हजार मे. टन इतके कमी गाळप केले आहे. कारखान्याला 21 कोटी 54 लाख 66 हजार रूपये इतका प्रचंड तोटा झाला आहे. इतर कारखान्यांचे तुलनेत घोडगंगा कारखाना 500 ते 1200 रूपये प्रती कमी भाव देत आहे. कारखान्याचे चेअरमन अशोक पवार हे 25 वर्षे सलगपणे कारखान्याचा कारभार पाहत आहेत.
2009-10 मध्ये कारखान्याचे 2500 वरून 5000 मेट्रीक टन विस्तारवाढ करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी मिळाली. को-जन व विस्तारवाढ साठी सभासद व शेतकन्यांकडून 7 कोटी 75 लाख रूपये जमा करून घेण्यात आले. 2010 मध्ये राज्यातील अनेक कारखान्यांनी को-जन सुरू केले. कारखान्याचा संपूर्ण प्रस्ताव व्हीएसआय रिपोर्ट सह तयार असताना कारखान्याचे चेअरमन अशोक पवार यांनी विस्तारवाढ न करता घोडगंगा कार्यक्षेत्रात व्यंकटेशकृपा खासगी साखर कारखान्याची सन 2011-2012 मध्ये उभारणी केली.
शेजारील आजूबाजूने 2500 मेट्रीक टन गाळप क्षमतेचे सोमेश्वर, माळेगाव, भीमाशंकर, इत्यादी कारखान्यांनी विस्तारवाढ करून गाळप क्षमता 2500 वरून 6000-7500 मे. टन केली. जास्तीचे गाळपामुळे हे सर्व कारखाने 25 ते 26 कोटी रूपये या दरम्यान नफ्यात आहेत. या वर्षीची एफआरपी देणेसाठी हंगाम पूर्व 55 कोटी रुपये कर्जातील 21 कोटी रुपये वापरणेत आले आहेत. हे सर्व नुकसान अध्यक्षांच्या खासगी साखर कारखान्याच्या हितसंबंधामुळे झाले आहे. या नुकसानाची जबाबदारी स्विकारून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
-सुधीर फराटे, शिवसेना तालुकाप्रमुख शिरूर