दोन्ही पालखी पालखी सोहळे जिल्ह्यात दाखल
नीरा – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 753 व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी संत नामदेव महाराजांचा व पंढरपूरच्या पाडुरंगाचा पायी पालखी सोहळा आळंदीकडे निघाला आहे. दोनही पालखींचे शनिवारी (दि. 2) पुणे जिल्ह्याच्या हद्दीत नीरा (ता. पुरंदर) येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्या आधी नीरा नदीतील दत्त घाटावर दोन्ही पादुकांना स्नान घालण्यात आले.
पंढरपूरच्या पाडुरंगाचा पायी पालखी सोहळा 2014 पासून सुरू झाला आहे. यावर्षी पांडुरंग पालखी सोहळ्यासोबत रथाच्या पुढे 16 तर रथा मागे 10 दिंड्या चालत आहेत. साडेपाच हजार वारकरी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. सकाळी पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यातील मुक्काम आटपून पुणे जिल्ह्याकडे प्रस्थान केले होते.
नामदेव महाराजांच्या पालखी सोबत महाराजांचे वंशज माधव महाराज नामदास, मुकुंद महाराज नामदास, निवृत्ती नामदास, मुरारी नामदास तसेच पालखीसोबत 50 दिंड्या असून किर्तनकार राममहाराज झेजुरके, बाळू महाराज उखळीकर, बाबा महाराज आजरेकर, सोपानकाका टेंबूकर, चोपदार बापुसो ताड उपस्थित होते.
पालखी सोहळ्याकरिता पंढरपूरपासून आळंदीपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज ट्रस्ट यांच्याकडून पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला असल्याची माहिती सोहळा मालक नामदास महाराज यांनी दिली. यानिमित्ताने नीरेतील शिंपी समाज व झांबरे परिवाराच्या वतीने विठ्ठल नामदेव मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या विसाव्यानंतर आद्य रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या वाल्हे गावाकडे मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.