वेनवडीत सिमला मिरचीला 15 गुंठ्यात मिळाली संजीवनी
दीपक येडवे
वीसगाव खोरे – वेनवडी (ता. भोर) येथील प्रयोगशील शेतकऱ्याने लाल, पिवळ्या रंगाच्या सिमला मिरचीची शेती यशस्वी केली आहे. 15 गुंठे क्षेत्रात पॉलीहाऊस बांधून या सिमला मिरचीचे उत्पादन घेतले आहे.
वेनवडी येथे रासायनिक खतांचा, औषधांचा वापर करून बाळासाहेब मारुती कुमकर हे 15 गुंठ्यात सिमला मिरचीचे उत्पादन घेत आहेत. मिरचीच्या लागवडीपूर्वी 15 ट्रॉली शेणखत मिसळून बेसल डोस देताना निंबोळी पेंड 300 किलो, ह्युमिक्रिस 200 किलो, क्रोमा 200 किलो, बेनसल्फ 10 किलो, ह्युमिक दाणेदार 10 किलो, बायोझाइम 8 किलो, सी गोल्ड 10 किलो, महाफीड कॉम्पलेक्स 25 किलो, मायकोराइझा 4 किलो,
ट्रायकोडमी 4 किलो यांचे मिश्रण करून बेड तयार केला. बेडची उंची 1 फूट, रुंदी 3 फूट, दोन बेडदरम्यान अंतर 1 फूट ठेवले आणि लागवड केली. रंगीत ढोबळी मिरची पिकाची उंची आणि फळांचे वजन जास्त असल्याने गादीवाफ्यावर अडीच मीटर उंचीवर समांतरपणे दोन तारा बांधून, रोपांच्या लागवडीनंतर 20 दिवसांनी शेंडा धारदार कात्रीने खुडून घेतल्याने मिरची रोपाला फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत झाली. या फुटव्यांना आधारासाठी सोडलेल्या दोऱ्या बांधून घेतल्या.
1 टन उत्पादन, 120 रुपये प्रतिकिलो दर
लागवडीनंतर 70 दिवसांनी मिरचीची काढणी सुरू झाली. त्यांच्या जाती आणि रंगानुसार प्रतवारी करून गुलटेकडी पुणे येथे विक्री केली जाते. पॉलीहाऊसमध्ये तापमान, आर्द्रता व सूर्यप्रकाश नियंत्रित होत असल्याने भरपूर उत्पादन व उच्च प्रतीची फळे मिळत असल्याने सरासरी 100 ते 120 रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसांत एक टन उत्पादन मिळाले आहे. पुढील सहा महिने मिरचीचे उत्पादन आठ टन होण्याची आशा आहे, अशी माहिती वेनवडीचे शेतकरे बाळासाहेब कुमकर यांनी दिली.
3 हजार 800 रोपांची लागवड
कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्याकडून 3 हजार 800 रोपे 10.50 रुपयांप्रमाणे प्रति रोप विकत आणून झिकझॅक पद्धतीने रोपे लावण्यासाठी छिद्र पाडून रोपांची लागण केली. फळांची काढणी सकाळी अथवा सायंकाळी केली. तीक्ष्ण धार असलेल्या चाकूने फळे झाडावरून देठासहीत काढून फळांचा आकार व वजनानुसार त्याची प्रतवारी केली.
किडीचा प्रादुर्भाव वाढू दिला नाही
रंगीत ढोबळी मिरची मर, भुरी, फायटोफथोरा, सिकॉस्पोरा लीफ स्पॉट, मोझॅक व्हायरस, मावा, फुलकिडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाने गळतात, झाडाची वाढ खुंटते आणि फळांची गुणवत्ता कमी होते. या पिकांवर अनेक रोगांपासून बचाव होण्यासाठी बुरशीनाशका पावडरीसह, रासायनिक मिश्रणांचा वापर केला.