विमानतळबाबतच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष : भाजपाच्या संघटन बांधणीवर भर
सासवड – राज्यातील सत्ता संघर्षाच्या राजकारणानंतर राज्यातील मंत्रिमंडळ स्थिर होत असतानाच सुरुवातीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी पुरंदर तालुक्याला वेळ देऊन सभा घेतली. यापाठोपाठच आता (दि.7) सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्र्यांचा दौरा पुरंदर तालुक्यात होत आहे. पुरंदरच्या बहुप्रतीक्षित विमानतळ, गुंजवणी, राष्ट्रीय बाजार हे मुद्दा पुन्हा समोर येऊन विमानतळाच्या भूसंपादनाचा प्रश्न सध्या जोर धरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे. या दौऱ्याला आगामी लोकसभेसाठी भाजपाच्या रडारवर असलेली बारामती लोकसभेची किनार असल्याचे मानले जात आहे.
मागील भाजपा सरकारने पुरंदरमध्ये छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर केले होते. यासंदर्भात अनेक परवानग्या मिळाल्या होत्या. परंतु महाविकास आघाडी सरकारने विमानतळाची जागा बदलून बारामती व दौंड पुरंदरच्या शिवेवर नेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु विमानतळ प्राधिकरणाने यास नकार दिल्यानंतर विमानतळाचे घोंगडे भिजत पडलेले होते. याच दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विमानतळाचा मुद्दा पुन्हा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उपस्थित करून विमानतळ करण्यावर भर
दिला आहे.
पुरंदर तालुक्यात (दि.2) ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळ पुरंदरमध्ये करणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 महिन्यामध्ये पुरंदरच्या दौऱ्यावर येत आहेत. ते देखील विमानतळासंदर्भात काही घोषणा करू शकतात. त्यामुळे भूसंपादन करण्याच्या प्रक्रियेला वेग येऊ शकतो, अशी चर्चा सध्या सुरू होत आहे. शेतकरी संघर्ष समिती देखील त्याच पद्धतीने आक्रमक होताना दिसत आहे.
(दि.7) सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भिवडी येथे आद्य क्रांती राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्यासाठी येत आहेत. पुरंदरच्या गुंजवणी, विमानतळ, राष्ट्रीय बाजार या संदर्भात काय बोलतात, याकडे देखील नागरिकांचे लक्ष
लागले आहे.
बारामती लोकसभेची किनार
भाजपाने 2024 मधील लोकसभेसाठी “मिशन 45′ ही मोहीम हाती घेतली आहे. यात बारामती लोकसभेचा समावेश आहे. बारामतीसह अन्य मतदारसंघात वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. बारामतीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यापूर्वीच उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा पुरंदरमध्ये होत आहे. त्यामुळे पुरंदरमध्ये राजकीय समीकरणे जुळविण्याची रणनीती आखली जात आहे. लोकसभा मतदारसंघातील दौरे हे बारामतीसाठी किनार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.