वाल्हे – पुरंदर तालुक्यातील वाल्हेसह नव्याने स्थापन झालेल्या सुकलवाडी, आडाचीवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. राजकीय मतभेद विसरून विकासकामांना प्राधान्य देण्यासाठी पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिंगबर दुर्गाडे यांच्या पुढाकाराने आदर्श गाव करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. राजकीय मतभेद विसरून सामाजिक सलोखा राखण्यासाठी तिन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध करण्यात पुढारी व ग्रामस्थांना यश आले.
वाल्हेच्या 13 सदस्यांच्या जागांसाठी 38 अर्ज आले होते. व सरपंच पदासाठी 5 उमेदवारी अर्ज आले होते. सदस्यपदासाठी 13 अर्ज शिल्लक राहिल्याने तसेच सरपंचपदासाठी अतुल गायकवाड यांचा अर्ज राहिल्याने वाल्हे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. सुकलवाडी येथे सर्वपक्षीयांना सामावून घेत निवडणूक देखील बिनविरोध पार पडली. सुकलवाडीच्या 9 सदस्यांच्या जागांसाठी 20 अर्ज आले होते. सरपंचपदासाठी 5 उमेदवारी अर्ज आले होते. यातील 11 सदस्य पदाचे अर्ज माघारी घेतल्यानंतर 9 सदस्य बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंचपदाचे 4 अर्ज परत घेतल्यानंतर संदेश पवार यांचा एकमेव अर्ज राहिल्याने संदेश पवार यांची सुकलवाडीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली.
आडाचीवाडीच्या 9 सदस्याच्या जागांसाठी 9 अर्ज आले होते. व सरपंच पदासाठी 1 उमेदवारी अर्ज आल्याने, उमेदवारी अर्ज माघार घेण्यापूर्वीच एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचा मान पटकावला होता. आडाचीवाडीच्या सरपंचपदी सुवर्णा पवार यांची बिनविरोध निवड झाली. वाल्हे, आडाचीवाडी, सुकलवाडी ही तीन गावे बिनविरोध जाहीर केली आहेत.
वाल्हे ग्रामपंचायत व त्यातून विभक्त झालेल्या आडाचीवाडी, सुकलवाडी, वागदरवाडी या चार ग्रामपंचायतींकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. त्यातील दोन गावे ही जिल्हा बॅंकेचे अधक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे व दोन गावे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या विचारांची असल्याने चार गावांमध्ये जोरदार रणसंग्राम घडणार, अशा चर्चा होत्या. मात्र, सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घेत चारही गावांच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते.
मात्र, आडाचीवाडीत निवडणुकीचे अर्ज भरण्याअगोदरच रायगडचे उपजिल्हाधिकारी व आडाचीवाडीचे सुपुत्र संदेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निश्चित केली होती. फक्त निवडणुकीची प्रक्रिया म्हणून त्यांचेच अर्ज दाखल केले. सुकलवाडीत बिनविरोध करण्यासाठी माजी सरपंच दत्तात्रेय पवार, राहुल यादव, सुकलवाडीचे माजी उपसरपंच धनंजय पवार, मोहन पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष नारायण पवार आदींनीसह, ग्रामस्थांनी बिनविरोध निवडणुकीच्या बाजूने कल दिला. मात्र, गावाने कौल फेटाळत निवडणुकीला पसंती दर्शवली आहे.
सर्वपक्षीय नेत्यांचे प्रयत्न
आडाचीवाडीपाठापोठ प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, भाजपचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते, माजी सभापती गिरीश पवार, माजी सरपंच दत्तात्रेय पवार, महादेव चव्हाण, अमोल खवले, सागर भुजबळ, माजी तंटामुक्तीचे अध्यक्ष सत्यवान सूर्यवंशी, डॉ. रोहिदास पवार, प्रदीप चव्हाण या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनंतर अखेर वाल्हे ग्रामपंचायत पहिल्यांदाच बिनविरोध निवड झाली.