खर्च आला 4 हजार उत्पन्न मिळाले 1500 रुपये
बेलसर : पुरंदर तालुक्यात अतितीव्र दुष्काळात जाहीर झाला असली तरी, देखील अत्यंत कमी पाण्या सोबतच सुयोग्य नियोजन करून शेतकरी शेतामध्ये भाजीपाला पिकवतात. अलीकडील काळात तालुक्यात कोथींबिरीची लागवड करण्यात आली होती; परंतु कोथींबिर तीन बाजारात नेऊन सुद्धा विकलीच नसल्याने कोथिंबीर उत्पादक शेतकरी आणि व्यापारी हवालदित झाले आहेत.
पुरंदर तालुक्यातील पिसे गावचे रहिवासी निलेश मुळीक यांनी शेतकर्यांची कोथींबिर खरेदी केली. कोथींबिरची काढणी केली व गाडीत भरून प्रथम कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड पुणे येथे विक्रीसाठी नेले; परंतु कोथींबिरीचे बाजारभाव ढासळल्यामुळे मार्केट यार्डमध्ये कोथींबिर विकलीच नाही.
मुळीक यांनी कोथींबिर पुन्हा सासवड बाजारात विक्री करण्याचे नियोजन केले. परंतु सासवड बाजारातही कोथींबिर विकली गेली नाही. त्यानंतर वैतागून मुळीक यांनी सासवड-नारायणपूर रोड लगत भिवडी (ता. पुरंदर) येथे कोथींबिरचा टेम्पो खाली केला व तेथे हातविक्री चालू केले; परंतु तेथेही कोथींबिरला म्हणावे, अशी मागणी नव्हती त्यामुळे मुळीक यांना मोठा तट तोटा सहन करावा लागला आहे.
मुळीक यांच्या म्हणण्यानुसार एकूण 4500 गाडी भाड्याचा खर्च झाला असून जवळपास 4 हजार रुपये काढण्याची मजुरी व इतर मजुरी खर्च झाला आहे आणि यातून निव्वळ 1500 रुपये उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे निलेश मुळीक व कुणाल मुळीक या तरुणांना निराशा हाती आली आहे तर कोथींबिरीचे भाव अत्यंत कमी असल्याने मुळीक यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे.