मंचर – निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या नवीन बैलगाडा घाटासाठी नवनिर्वाचित सरपंच रवींद्र वळसे पाटील, बैलगाडा मालक, ग्रामस्थ यांनी पुढाकार घेतला असून, झालेल्या ग्रामसभेत बैलगाडा घाटाचा प्रश्न मार्गी लावत बैलगाडा घाटाचा भूमिपूजन समारंभ गावातील बैलगाडा मालक, ग्रामस्थ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला आहे.
निरगुडसर गावात पूर्वी जुना घाट होता. मात्र, बैलगाडा शर्यती बंद झाल्यानंतर घाटाशेजारील खालच्या बाजूस ग्रामीण रुग्णालय बांधण्यात आले आहे, त्यामुळे जागेअभावी जुन्या घाटात बैलगाडा शर्यती घेता येत नव्हत्या. गावात नवीन घाट व्हावा यासाठी बैलगाडा मालक, बैलगाडा प्रेमी यांच्याकडून मागणी केली जात होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या निरगुडसर ग्रामपंचायत निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच रवींद्र वळसे पाटील यांनी सरपंच झाल्यास गावात बैलगाडा घाट बांधण्यास प्राधान्य दिले जाईल, असा शब्द मतदार व बैलगाडा मालकांना दिला होता.
त्यांनी दिलेल्या शब्दांनुसार झालेल्या गावाच्या पहिल्याच ग्रामसभेत बैलगाडा घाटाबाबत सकारात्मक चर्चा झाली आणि बैलगाडा घाटाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. निरगुडसरच्या यात्रेपर्यंत घाट पूर्ण करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी निरगुडसरचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, बैलगाडा मालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, व शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घाटाचे काम पूर्ण केले जाईल. घाटासाठी लागणारी मदत दोन्हीं नेत्यांच्या माध्यमातून घेतली जाईल व यात्रेपर्यंत घाट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.” -रवींद्र वळसे पाटील, सरपंच, निरगुडसर