पुणे – भिडेपूल ते डेक्कन बसथांब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रडतखडत सुरू असलेल्या या कामाचा फटका डेक्कन परिसर आणि पेठांमधील वाहतुकीला बसत आहे. या भागात सकाळी आणि सायंकाळी ऐन वर्दळीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, त्याचा फटका पुणेकरांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे तातडीने हे काम संपविण्याची मागणी केली जात आहे.
डेक्कन जिमखाना तसेच जंगली महाराज रस्त्यावरून येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी या रस्त्याखालून महापालिकेने सुमारे १,६०० मिमी व्यासाची पावसाळी वाहिनी टाकली होती. मात्र, मेट्रो स्थानकाकडे जाणार्या प्रवासी मार्गासाठी उभारलेला खांब या पावसाळी वाहिनीतच उभारण्यात आला. त्यामुळे डेक्कन परिसराला पूरस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे महापालिकेकडून येथे नव्याने सांडपाणी वाहिनी टाकण्यात येत आहे. मात्र, हे काम अंतिम टप्प्यात असतानाच या नवीन वाहिनीच्या समोरच सांडपाणी केंद्राकडे जाणारी आणखी एक ९०० मिमी व्यासाची वाहिनी आहे. त्यामुळे हे काम दोन आठवड्यांपासून बंद आहे. हे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असताना आता या कामासाठी आणखी महिनाभर लागण्याची शक्यता आहे.
सुमारे तीन लाख दुचाकींची कोंडी ?
डेक्कन परिसरातून सर्व दुचाकी याच रस्त्याने शहराच्या मध्यवर्ती भागात येतात. खरेदीसाठी आलेली वाहने भिडे पूल नदीपात्रात दोन्ही बाजूंनी उभी केली जातात. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, शास्त्री रस्ता तसेच अंतर्गत भागांत कोंडी होत असल्याने छोटी वाहने तसेच नदीपात्रातील वाहने डेक्कनकडून शहराबाहेर पडतात. मात्र, आता हा रस्ता बंद झाल्याने या वाहनांना पेठांमधून बाहेर पडावे लागते. अथवा डेक्कनकडे जाण्यासाठी छत्रपती संभाजी पुलावरून पुढे जवे लागते.
डेक्कनकडून येणाऱ्या वाहनांना टिळक चौकातून लक्ष्मी रस्ता तसेच कुमठेकर रस्त्याने शहरात यावे लागते. परिणामी कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, या डेक्कनला जोडणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा ताण येत आहे. तीन ते चार मिनिटांच्या प्रवासासाठी वाहनांना ३० ते ३५ मिनिटे लागत आहेत. नदीपात्रातील रस्त्याला जोडणारा हा महत्वाचा रस्ता असल्याने त्यावरून दिवसाला सुमारे तीन लाख दुचाकी जातात.
वाहतूक नियोजनाचा विसर
हा रस्ता कामासाठी दोन महिने बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहतूक वळवल्याचे आदेश महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी काढले आहेत. मात्र, या कामामुळे होणारी संभाव्य कोंडी फोडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. या कामामुळे खंडोजीबाबा चौक, नदीपात्र, टिळक चौक, जंगली महाराज रस्त्यावर वाहतूक कोंडी होणे अटळ होते. त्यामुळे या भागात अतिरिक्त वाहतूक पोलीस, ट्रॅफिक वाॅर्डन नेमणे, नागरीकांना कामाच्या माहितीचे सूचना फलक लावणे, बेशिस्त वाहनांवर कारवाई करणे, रस्त्याच्या बाजूचे पार्किंग बंद करणे हे उपाय आवश्यक होते. पण, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे.
“नदीपात्रातील काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, नवीन पावसाळी वाहिनी नदीला जोडण्याच्या ठिकाणी ड्रेनेजची ट्रंक लाइन आली आहे. तेथेच मेट्रोचे खांबही आहेत. त्यामुळे काम थांबलेले असून त्यावर तोडगा काढण्यात आला असून, पुढील तीन आठवड्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.” – श्रीधर येवलेकर, कार्यकारी अभियंता, मलनि:सारण विभाग, मनपा