– डॉ. दत्ता कोहिनकर
रामचंद्रकाका निवृत्त होऊन दोन वर्षे उलटली होती. सरकारी अधिकारी पदाची नोकरी म्हणून तीस हजार रुपये पेन्शन चालू होती. एकुलता एक मुलगा अभिजित अमेरिकेतील नामांकित कंपनीत अधिकारी होता. याच कंपनीतील अभियंता मुलीशी विवाहबद्ध होऊन अमेरिकेतच स्थायिक झाला. रामचंद्रकाका व त्यांची पत्नी मालती अलिशान बंगल्यात खुशीत दिवस काढत होते. एके दिवशी दुर्दैवाने काळाने मालतीवर झडप घातली. हृदयविकाराने मालतीचा मृत्यू झाला.
रामचंद्रकाका एकटे पडले. मुलाने अमेरिकेतील कंपनीबरोबर पाच वर्षांचा करार केला होता. त्यालाही भारतात परतणे अवघड झाले. दिवसभर काय करायचे? सहा खोल्यांचा टुमदार बंगला काकांना खायला उठायचा. रात्री बंगल्यात एकट्याला भीती वाटायची. भविष्याची चिंता मनाला अस्वस्थ करायची. मनोमन काका नैराश्याकडे जायचे. एकटे जगणे अशक्य आहे, कोणीतरी आपली काळजी घेणारी प्रेमळ सहचारिणी असावी असे त्यांना वाटू लागले. शरीराला वय असते, मनाला वय नसते.
काकांचे मन पुन्हा एकदा आपल्याच वयाच्या महिलेशी विवाहबद्ध होऊ पाहात होते. मुलाचे व त्यांचे संबंध मित्राप्रमाणे असल्याने त्यांनी मुलाला या गोष्टीबाबत फोनवर विचारणा केली. मुलाने त्यांना वय-खानदान-इज्जत-समाज यासारख्या अनेक गोष्टींना अनुसरून अपमानित केले. काकांच्या मनात स्वतःविषयी अपराधीपणाची भावना निर्माण झाली. एकुलत्या एका मुलाच्याही नजरेत आपण पडलो या भावनेने त्यांना नैराश्य आले. झोप उडाली. मानसिक दुर्बलता आली. आत्महत्येचे विचार मनात डोकावू लागले.
त्यांना या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांच्या फॅमिली डॉक्टरने दिलेल्या सल्ल्यानुसार ते ध्यान करण्यासाठी केंद्रावर आले होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना पूर्णतः बोलून मनाने हलके केले व त्यांच्या मुलाला फोनवरून त्यांना पितृऋण म्हणून मदत करण्यासाठी थोडं समाज-वय-प्रतिष्ठा या गोष्टी बाजूला ठेवून पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिला. अभिजितने या विषयावर अमेरिकेत समुपदेशकाची मदत घेतली व समुपदेशनानंतर तो 60 वर्षांच्या आपल्या वडिलांच्या पुनर्विवाहाला तयार झाला. पेपरला दिलेल्या जाहिरातीवरून 58 वर्षांच्या विधवा सुमतीकाकूंचे व रामचंद्रकाकांचे सूर जुळाले.
दोघांनीही एकमेकांना समजून घेत विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. अभिजित बायकोसह अमेरिकेतून सुट्टी काढून पुण्यात आला. त्याने काका-काकूंना आळंदीला नेले व नोंदणी पद्धतीने त्यांचा पुनर्विवाह लावून दिला. आपल्या टुमदार बंगल्यात हे वृद्ध जोडपे आनंदाने जगत आहे. मित्रांनो, असे किती काका व काकू सामाजिक बंधनाच्या-नातलगांच्या-मुलाबाळांच्या भीतीने एकटे जगायचे म्हणून जगत आहेत, नैराश्याकडे जात आहेत.
आत्महत्या करत आहे. एकटेपणा त्यांना सतावतोय. म्हणून पुण्यात माधव दामले या इंजिनिअरने ज्येष्ठ नागरिक लिव्ह इन रिलेशनशिप मंडळाची स्थापना करून 25 काका-काकूंना एकत्र आणून विवाहबद्ध केले आहे. ज्येष्ठांच्या सुखसमाधानाऐवजी स्वतःच्या इगोला, समाजबंधनाला व घराण्याच्या प्रतिष्ठेला आपण जास्त महत्त्व देतो.