सर्व राज्य सरकारांना समान रीतीने वागवू
श्रीनगर, दि. 9 – जनता सरकार विरोधी पक्षांच्या राज्य सरकारांत ढवळाढवळ करणार नाही. ती सरकारे कोसळविणार नाही. सर्व राज्य सरकारांच्या बाबतीत केंद्र सरकारची वागणूक समानच असेल,
असे आश्वासन जनता पक्षाचे सरचिटणीस मधु लिमये यांनी येथे दिले. ते पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. जम्मू-काश्मीरमध्ये जनता पक्षाचे सरकार नाही तरीही जनता पक्ष हा एक जबाबदारीने वागणारा विरोधी पक्ष म्हणून काम करील, असेही ते म्हणाले.
गरिबी हटविण्यासाठी एकी
मुंबई – गरिबी हटविण्यासाठी देशात सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी संघटितपणे कार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी केले. आज 9 ऑगस्टनिमित्त मध्य मुंबईत “क्रांति मैदाना’वर 25 हजारांहून अधिक कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा भरला होता.
राष्ट्रपती राहणार छोट्या घरात
नवी दिल्ली – राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी हे राष्ट्रपती भवनात न राहता छोट्या घरात राहायला जाण्याची शक्यता आहे. साधेपणाचा आदर्श वरिष्ठांनी जनतेला घालून द्यावा, असे रेड्डी यांचे मत आहे.