औंध -देशात जी परिस्थिती आहे ती भयंकर आहे. नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून देशात गरिबी वाढली आहे. आपल्या देशात जवळपास 80 कोटी लोक गरीब आहेत, देशामध्ये महागाई वाढली आहे, ती रोखणे आणि कमी करणे ही आगामी आव्हाने असणार आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केली.
बाणेर, बालेवाडी, सूस व महाळुंगेच्या वतीने बाणेर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आयोजित हळदी-कुंकू समारंभ विद्या चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला, त्यावेळी चव्हाण बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, राज्याचे मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्रातील साडेतीन पिठामध्ये कधी गेले नाही. पण, गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनाला जातात. महाराष्ट्रातील साडेतीन पिठांचा अपमान करणारा मुख्यमंत्री आम्हाला मान्य नाही, यांच्या मंत्रिमंडळात एकही महिलेला मंत्री म्हणून संधी दिली नाही, इतका मोठा महिलांचा अपमान फक्त शिंदे गट आणि भाजपच करू शकतो. महागाई वाढविणारे, देवांचा अपमान करणारे व महिलांना सन्मान न देणारे, असे हे सरकार राज्यातील जनतेलाही मान्य नाही, ही चूक परत होऊ नये याकरिता भाजपाला मतदान करू नका, असे जाहीर आवाहन चव्हाण यांनी केले. यावेळी प्रत्येक महिलेला भेट वस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच लकी-ड्रॉ काढण्यात आला व महिलांना पैठणी देण्यात आल्या तर सर्वात ज्येष्ठ महिला व विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे, राहुल बालवडकर, नितीन कळमकर, संजय ताम्हाणे, शहराध्यक्षा मृणालिनी वाणी, ज्योती सुर्यवंशी, माजी नगरसेविका रोहिणी चिमटे, शिला भालेराव, सुषमा ताम्हाणे, प्राजक्ता ताम्हाणे-दळवी, राखी श्रीराव, मानसी पाटील, अनशुमाला सिंग, माधुरी इंगळे, मीना विधाळे, प्राची सिद्दीकी यांच्यासह शेकडो महिला भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन सरला बाबुराव चांदेरे, ज्योती राहुल बालवडकर, शिल्पा नितीन कळमकर, रुपाली सागर बालवडकर व पूनम विशाल विधाते यांनी केले होते.