– आकाश वशिष्ठ
सध्या महाविकास आघाडीची वज्रमूठ तयार होत असताना भाजपलाही अशा आघाडीची गरज भासत असावी का? शिंदेंसह राज ठाकरे यांच्याशी सुत जुळण्याबाबत भाजपकडून चाचपणी केली जात आहे का?
भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच राज ठाकरे यांची भेट घेतली. ते पूर्वीही राज यांना भेटले होते. विशेषत: एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आणि नंतर शिंदेना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाल्यानंतरही फडणवीस आणि राज यांच्या भेटी झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्षी जी काही उलथापालथ झाली त्यात भाजपचाच हात होता हे आता लपून राहिलेले नाही. त्यांनी स्वत: त्याची कबुलीही दिली. आता तो विषय जुना झाला. मोठे बंड झाल्यावर शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट खिळखिळा होईल अशी भाजपची किंवा अन्य कोणाचीही अटकळ असावी. तसे वातावरण अद्याप महाराष्ट्रात जाणवत नाही. फडणवीस राज भेटीमागे हेच कारण आहे असे त्यामुळेच म्हणता येऊ शकते.
2014 च्या निवडणुकीपूर्वी “सबकुछ नरेंद्र मोदी’ अशी हवा होती. तोपर्यंत पारंपरिक पद्धतीने होणारा निवडणूक प्रचार मोदी यांनी हायटेक केला. सोशल मीडियाची ताकद भारतातील ज्या पहिल्या नेत्याला समजली ते म्हणजे नरेंद्र मोदी. त्यांनी त्याचा पुरेपूर वापर केला आणि आपला जनाधार वाढवला. इतर पक्षांची सोशल मीडियाची ट्युब पेटायला 2019 ची निवडणूक उजाडावी लागली. त्यातही मोदी यांनी जी आघाडी अगोदरच घेतली होती ती अधिक भक्कम केली. इतकी की सोशल मीडियावरच्या मोदींच्या वॉर रूमचा सामना करण्यासाठी विरोधकांकडे अगदीच तुटपुंजी ताकद होती व ती उघडही झाली. आता विरोधक बऱ्यापैकी सावरले आहेत. कॉंग्रेसने सोशल आघाडी भक्कम केली आहे. अन्य पक्षांनीही योग्य काम केले आहे.
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्षही तुल्यबळ आव्हान या मीडियाच्या माध्यमातून उभे करत आहेत. राजकीय पक्षांचे स्थानिक नेतेही याचाच वापर करून आपली प्रतिमा चमकवताना दिसत आहेत. थोडक्यात, मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याच्या या मार्गात आता भाजपला स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यांचा प्रचाराचा प्रत्येक मुद्दा मुद्देसूदपणे खोडून काढण्याचा प्रयत्नही होतो आहे. त्याचा त्यांना फटका बसला.
निकालांनी केले सावध
कॉंग्रेसची सोशल मीडिया आघाडी भाजपला सडेतोड उत्तर देताना दिसते आहे. त्यालाही साधारण दीड ते दोन वर्षांपासून सुरुवात झाली. मोदी किंवा भाजपने सेट केलेल्या अजेंड्यामागे न जाता कॉंग्रेस भाजपची मांडणी खोडण्यात यशस्वी झाली. त्याचे परिणाम हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातही दिसून आले. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा कॉंग्रेसला लाभ झाला. तथापि, ही यात्रा पारंपरिक माध्यमांपेक्षा सोशल मीडियातच अधिक चर्चेची ठरली आणि प्रभाव पाडू शकली. तिचा गाजावाजा झाला. गुजरातने भाजपला बळ दिले तरी दोन राज्ये पक्षाला गमवावी लागली. 2014 नंतर “भाजप बोले आणि सगळे चाले’ अशी असणारी स्थिती आता नाही आहे, असे स्पष्ट दिसते आहे.
भाजप अगदीच बॅकफूटवर जाईल असे नाही. पण भाजपला रोखू शकतो, पराभूत करू शकतो हा विश्वास गेल्या काही महिन्यांत विरोधी पक्षांना वाटू लागला आहे. त्यांना जे वाटते आहे ते भाजपनेही अगोदरच हेरले असल्यामुळे भाजपची वेगळी नरमाईची भूमिकाही आता दिसू लागली आहे. आपल्याला आपल्या मतांची टक्केवारी वाढवावी लागणार आहे. मोदींच्या लोकप्रियतेच्या भरतीच्या काळातही आपण 37 टक्के मतांपर्यंत पोहोचलो होतो. सत्ता राखायची असेल तर किमान तेवढी टक्केवारी राखावी लागेल आणि त्यात वाढही करावी लागेल हा बोध त्यांनी घेतला आहे.
एनडीएची आली आठवण
अटलबिहारी वाजपेयींच्या काळात सत्तेवर असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नाव क्वचितच गेल्या 9 वर्षांत ऐकायला मिळाले. त्या आघाडीची अर्थात एनडीएची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. एनडीएच्या जुन्या नेत्यांपुढे आग्रहाचा हात धरला जातो आहे. काही नेत्यांकडून सकारात्मक प्रतिसादही मिळतो आहे. भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी मध्यंतरी पंतप्रधानांनी चर्चा केली. त्यात अर्थातच निवडणुकीच्या तयारीचे सांगण्यात आले. एरव्हीही भाजप निवडणुकीसाठी सज्जच असतो. मात्र, आताची तयारी वेगळी आहे. ती टक्केवारी वाढवण्याची. त्याकरता सोशल माध्यमे आणि अन्य पारंपरिक माध्यमे, मोदींचे वक्तृत्व, संघटनेचे पाठबळ, कार्यकर्त्यांची फळी हे सगळे आहेच, तथापि, ते पुरेसे नाही. टक्केवारी वाढीसाठी जुन्या नाराज मात्र विरोधात न गेलेल्या मित्रांना साद घातली जाते आहे. छोट्या पक्षांना पुन्हा सोबत घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. उत्तर प्रदेश असो वा बिहार वा पंजाब… पक्षाने त्या दिशेने पावले उचलली आहेत.
म्हणून राज ठाकरे महत्त्वाचे
संख्याबळाच्या अर्थाने राज ठाकरे यांचे विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थान नगण्य आहे. पण महाराष्ट्रात त्यांच्याएवढा गर्दी खेचणारा आणि करिश्मा असलेला अन्य नेता कोणी नाही. भाजपला मुंबईही जिंकायची आहे, विधानसभाही जिंकायची आहे आणि लोकसभाही. उद्धव ठाकरेंना धक्का दिल्यावरही त्यांच्याबद्दल जनमानसात सहानुभूती आहे हे लपून राहिलेले नाही. शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांची आजही खिल्ली उडवण्याचे प्रकार सुरू आहेत. ते नेते आपापल्या भागातील शक्तिशाली नेते असले तरी जनता जेव्हा निवडणूक हातात घेते तेव्हा इंदिरा गांधीही पराभूत झाल्याचे या देशाने पाहिले आहे. मुंबई महापालिकेत जर सत्ता मिळवायची असेल तर राज यांचा करिश्मा उपयोगाला येणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
मात्र विधानसभा आणि लोकसभेत महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या एकत्रित टक्केवारीला हादरा द्यायचा असेल तर त्याकरता तशी वातावरण निर्मिती होणे गरजेचे आहे. साधारण वर्षभराचा काळ आता हाती आहे. वातावरण निर्मिती करायला भक्कम वक्ता असला तर हा काळ पुरेसा आहे. राज-फडणवीस भेटीमागे हे टक्केवारीचे राजकारण असण्याची शक्यताच अधिक आहे. राज प्रत्यक्ष सोबत येतात की नेहमीप्रमाणे एकटे जात हे वातावरण बदलतात ते भाजप आणि मनसेच्या बोलणीतून ठरेलच. मात्र येत्या काळात अशा भेटी वाढतच जाणार आहे, हे मात्र नक्की.