दत्तात्रय गायकवाड
वाघोली – सध्या हवेली तालुक्यात अनेक गावच्या यात्रा-जत्रांचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. बैलगाडा शर्यतींवर असणारी बंदी उठवल्यामुळे पुणे जिल्ह्यातील अनेक भागात बैलगाडा शर्यती मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्यात येत आहे. याच धर्तीवर हवेली तालुक्यात देखील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यतीतून राजकीय मोर्चेबांधणी करत अनेकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राजकीय घाट उभा करण्याचा मानस केल्याचे चित्र हवेली तालुक्यात दिसून येत आहे.
पुणे जिल्ह्यातील राजकारणावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकणारा एकमेव तालुका म्हणून हवेली तालुका ओळखला जातो. सध्या पुणे महानगरपालिकेत तेवीस गावांचा समावेश झाल्यानंतर या गावांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचे आखाडे रंगणार आहेत तर दुसरीकडे उर्वरित इतर गावांमध्ये पंचायत समित्या जिल्हा परिषद तथा ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. बैलगाडा शर्यतीही सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी एक अविभाज्य भाग बनला आहे. हवेली तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित गावांमध्ये सध्या अनेक उत्सवानिमित्त तसेच जत्रा-यात्रा विविध कार्यक्रमानिमित्त बैलगाडा शर्यती भरणार आहेत.
या शर्यतींसाठी घाटांची निर्मिती अनेक गावांनी यापूर्वीच केलेली आहे. काही गावांनी सामाजिक बांधिलकी जोपासत लोकवर्गणीद्वारे समाजातील उच्चपदस्थ प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहकार्यातून बैलगाडा शर्यतीसाठी आकर्षक घाट उभे करण्यात येत आहेत. या घाटांच्या निर्मितीसाठी सध्या सामाजिक जाणीव ठेवून अनेक दानशूर मंडळींकडून सढळ हाताने मदत केली जात आहे.
काही व्यक्तींकडून ही मदत बैलगाडा शौकीनांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. तर अनेक राजकीय मंडळींनी आपापल्या गावांचा यात्रौत्सव दिमाखदार साजरा करून राजकीय प्राबल्य सिद्ध करण्याचा अट्टाहास देखील केला आहे. त्यामुळे या शर्यती बैलगाडा शौकीन तसेच बैलगाडा चालक मालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणाऱ्या ठरणार आहेत.
लोणीकंद येथील बैलगाडा शर्यत घाट बांधण्यासाठी एक लाख रुपयांचा कृतज्ञता निधी दिला आहे. या घाटातून अनेक लोकांचे आनंदाचे व उत्साहाचे आवाज ऐकू येतील. त्या प्रत्येक आनंदाचे सोबती होण्याचे भाग्य प्रत्येकाला लाभावे यासाठी नागरिकांनी घाटासाठी मदत करण्याची गरज आहे.
– प्रदीप कंद, युवा नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष