पुणे, दि. 19 -शहरात मागील दोन दिवस पाऊस थांबला असला तरी सोमवारी झालेल्या पावसानंतर शहरावर ओढावलेल्या पूरस्थितीवरून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या प्रकल्पांविरोधात आता नागरिकांनीच रस्त्यावर उतरावे, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी भाजपच्या कारभारावर बोट ठेवले आहे. तर राष्ट्रवादीचे नेते पर्यावरणाच्या नावाखाली विकासकामांममध्ये अडथळे निर्माण करत असल्याची टीका भाजपचे गणेश बिडकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
भविष्यात पावसाचे प्रमाण 34 टक्क्यांनी वाढणार असून, ढगफुटीच्या घटना सातत्याने होतील, असा अहवाल टेरी या संस्थेने दिला आहे. शहरातील कुठलीही विकासकामे करताना हा अहवाल आधारभूत धरण्यात यावा, अशी आम्ही सातत्याने मागणी करत आलो आहोत. प्रशासन याची गांभीयाने दखल घेत नसल्याने सोमवारच्या पावसासारख्या घटना घडत आहेत, असा आरोप चव्हाण यांनी केला. आमदार सुनील टिंगरे, अंकुश काकडे, प्रदीप देशमुख उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी केवळ आरोप करत आहेत. नदी सुधारणा, मेट्रो, नदीकाठ विकसन अशा प्रकल्पांना विरोध करत ते न्यायालयातही गेले. मात्र, यातील कोणताही प्रकल्प न्यायालयाने थांबविला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला विकास खुपत असल्यानेच त्यांच्यांकडून विकासाच्या कामात राजकारण आणले जात असल्याची टीका बिडकर यांनी केली आहे.