तुळापूर – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधुन छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती यांच्या वतीने (तुळापूर, ता हवेली) येथे काव्य स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ घेण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी छत्रपती संभाजी महाराज व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना नमन म्हणून गणेश ताम्हाणे यांचा शाहिरी कार्यक्रम करण्यात आला.
लॉकडाऊनच्या काळात अनेक नवनवीन कवी व कवयित्रींना माध्यम मिळावं म्हणून छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या वतीने काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याचे आयोजन ऑनलाइन स्वरूपात करण्यात आले होते. महाराष्ट्रभरातून 110 स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. तज्ञ परीक्षकांच्या माध्यमातून याचे परीक्षण करण्यात आले होते.
त्यामध्ये तीन विजेते, एक वायरल कवी, सर्वोत्कृष्ट सादरीकरण व 7 उत्तेजनार्थ असे 12 पुरस्कारथींची निवड करण्यात आली होती.
याप्रसंगी शिरुर-हवेलीचे आमदार अशोक बापू पवार, रामकृष्ण आण्णा सातव, (पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य) , सचिन जाधव (मा.सरपंच केसनंद) ,दीपक अप्पा गावडे (सरपंच वाडे बोल्हाई) ,रणधीर घोरपडे सरकार (असंघटिक कामगार पुणे जिल्हा अध्यक्ष) ,अप्पासाहेब हरगुडे (चेअरमन) ,ऍड.गुंफाताई इंगळे (सरपंच,तुळापूर), पवन खैरे (उपसरपंच,तुळापूर) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना आमदार अशोक बापू पवार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती आजपर्यंत वेळोवेळी समाजहिताचे उपक्रम हाती घेत आलेली आहे व संचारबंदीच्या काळात समाजाला दिशा देण्याचे काम सेवा समितीकडून झालेलं आहे. मागील वर्षी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रबोधन असो वा यावर्षीची काव्य स्पर्धा. या सर्व उपक्रमांचे कौतुक केलं पाहिजे व सर्वांनी अश्या उपक्रमात सहभाग घ्यायला हवा.
छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष शंकर जाधव म्हणाले, गडसंवर्धन, महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी उत्सवांसोबतच त्यांच्या विषयी साहित्य आणि प्रबोधनाच्या माध्यमातून घरोघरी विचार पोहचवणाऱ्या तरुण पिढीसाठी माध्यम उपलब्ध करून देण्याचे काम सेवा समिती करत आलेली आहे.
सेवा समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन कार्याध्यक्ष प्रवीण झांबरे, विशाल गावडे, अशोक ढाळे, प्रतिक जाधव, विक्रांत जाधव, आरती भोगाडे, कोमल पवार, कविता वाबळे व तुळापूर ग्रामस्थांनी केले.