नवी दिल्ली – देशात सध्या अनेक विधायक घडामोडी घडत आहेत, लसीकरणाचा विक्रम होत आहे, जीएसटी कलेक्शन विक्रमी पातळीवर गेले आहे, पी.व्ही. सिंधूला आणि भारतीय हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये चांगले यश मिळाले आहे, या सुखदायी घडामोडी कानावर पडल्यानंतर देशात सध्या अमृतमहोत्सव सुरू झाल्यासारखे वाटत आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
भारतीय स्वातंत्र्याला पुढील वर्षी 75 वर्ष होत आहेत. त्याच्या अमृतमहोत्सवाचे आयोजन सरकारने केले आहे, त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी वरील प्रतिक्रिया दिल आहे. ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे की, भारताने ऑगस्ट महिन्यात प्रवेश केल्याबरोबर विविध क्षेत्रांत अत्यंत विधायक घडामोडी घडत आहेत. ही अमृताचीच बरसात आहे असेही त्यांनी सूचित केले आहे.
भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी देशातील 130 कोटी जनता अधिक जोमाने काम करेल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. जुलै महिन्यात जीएसटीचे कलेक्शन 1 लाख 16 हजार कोटींवर गेले आहे.
गेल्यावर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत ही वाढ 33 टक्क्यांची आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत असल्याचे हे लक्षण असल्याचे केंद्र सरकारच्यावतीने सांगितले जात आहे.