नवी दिल्ली – पंतप्रधान मोदींकडून रोजगार मेळाव्या अंतर्गत भर्ती अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. यानुसार तब्बल ७५ हजार तरुणांना अपॉइंटमेंट लेटर देण्यात आल्याचे समजते. त्यासोबतच ५० केंद्रीय मंत्र्यांनी देखील वेगवेगळ्या ठिकाणी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तब्बल २० हजार जणांना अपॉइंटमेंट लेटर दिल्याचे समोर आले आहे.
सरकारी नोकऱ्यांसाठी निवडलेल्या उमेदवारांना पंतप्रधान मोदी आणि इतर मंत्र्यांनी नियुक्तीपत्रे दिली. त्याच वेळी, उर्वरित उमेदवारांना ईमेल किंवा पोस्टद्वारे नियुक्तीपत्र पाठविण्यात आली आहेत. युवकांना नियुक्ती पत्र देत पंतप्रधान मोदींनी त्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी पीएम मोदी म्हणाले, ‘गेल्या आठ वर्षांत देशात जी रोजगार आणि स्वयंरोजगाराची मोहीम सुरू आहे, आज त्यात आणखी एक दुवा जोडला जात आहे. रोजगार मेळाव्याची ही साखळी आहे. आज केंद्र सरकार 75 हजार तरुणांना नियुक्ती पत्र देत आहे.
तरुणांची भरती कुठे झाली?
या तरुणांना भारत सरकारच्या 38 मंत्रालयांमध्ये किंवा विभागांमध्ये नोकऱ्या देण्यात आल्या आहेत.
या तरुणांना गट-अ आणि ब (राजपत्र), गट-ब (नॉन-राजपत्र) आणि गट-क श्रेणींमध्ये वेगवेगळ्या मंत्रालयांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. केंद्रीय सशस्त्र दलातील कर्मचारी, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक, एमटीएस यासह विविध पदांवर भरती करण्यात आली आहे.
कोणी भरती केली?
भारत सरकारच्या विविध मंत्रालयांनी आणि विभागांनी स्वतः या तरुणांची भरती केली आहे. याशिवाय, युनियन लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग आणि रेल्वे भरती मंडळासारख्या भरती संस्थांनीही भरतीची अधिसूचना काढून तरुणांना नोकऱ्या दिल्या आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींनी विविध सरकारी विभाग आणि मंत्रालयांना पुढील दीड वर्षात ‘मिशन मोड’वर 10 लाख लोकांची भरती करण्यास सांगितले होते.