कात्रज, दि. 28 –डांबरीकरण केल्यानंतर पहिल्याच मोठ्या पावसात कात्रज-कोंढवा रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने कसरत करत वाहनचालकांना जावे लागत आहे. प्रशासनाने कोणत्या प्रकारचे डांबरीकरण केले आहे? असा प्रश्न नागरिक व वाहनचालक विचारत आहेत.
कात्रज-कोंढवा रस्ता अरुंद असून जड व इतर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. येथे नेहमीच वाहतूक कोंडी आणि अपघाताची मालिका सुरू असताना महापालिका प्रशासनाने अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अर्धवट काम करून नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
मात्र, काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली, तरी महानगरपालिका प्रशासनाने या कात्रज कोंढवा रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी पूर्णपणे डांबर निघून फक्त खडी उरली आहे.
काही ठिकाणी अजूनही तळी साचलेली दिसून येतात. यावरून दुचाकी वाहने घसरण्याचा धोका झाला आहे. तेव्हा लवकरात लवकर या रस्त्यावर डांबरीकरण करून खड्डे बुजवण्यात यावेत, अशी मागणी नागरिक करत आहे.
खडीमशीन चौकाकडून काम सुरू असून, लवकरच संपूर्ण रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येतील. पाऊस तसेच गोकुळनगर येथील बॅंकेसमोरील रस्त्यावर उप रस्त्याकडून येणारी माती व पाणी यामुळे तेथे डांबरीकरण करताना अडचणी येत आहेत. लवकरच डांबर टाकून खड्डे बुजवण्यात येतील.
– धनंजय गायकवाड,
उपअभियंता, पथ विभाग, मनपा