एबी पॉझिटिव्ह रक्तगटाचाही तुटवडा निर्माण होण्याची भीती
रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज
पिंपरी – शहरामध्ये सध्या निगेटिव्ह रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. एबी पॉझिटिव्ह रक्तसाठाही अपुरा असून रक्तपेढ्यांकडे सध्या सहा ते दहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. महापुरुषांच्या जयंत्यांनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमुळे रक्ताच्या तुटवड्याची अडचण भरून काढण्यात काही अंशी यश आले असले तरी रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
विविध आजारांमध्ये महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी रक्ताची गरज लागते. महिलांच्या प्रसुतीसाठी करण्यात येणारी शस्त्रक्रिया, अपघातामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असल्यास संबंधित रुग्णांना रक्त द्यावे लागते. त्याशिवाय, थॅलेसेमिया झालेल्या रुग्णांचे रक्त वारंवार बदलावे लागते. त्यामुळे त्यांना रक्ताची नेहमी गरज लागते. रुग्णाला आवश्यक रक्त देण्यासाठी रक्तदान हाच एकमेव पर्याय सध्या उपलब्ध आहे.
वायसीएममध्ये दहा दिवस पुरेल इतकाच साठा
महापालिकेच्या वायसीएम रक्तपेढीत सुमारे 300 रक्तपिशव्या सध्या उपलब्ध आहेत. येथे दररोज 30 ते 40 रक्तपिशव्यांची मागणी असते. त्यानुसार किमान दहा दिवस पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध आहे. निगेटिव्ह रक्तगट आणि एबी पॉझिटिव्ह रक्तगटाचा सध्या तुटवडा जाणवत आहे. रक्तपेढी अंतर्गत बुधवारी (दि. 14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला 3 रक्तदान शिबिर घेण्यात आले. शुक्रवारी (दि. 15) 2 तर, शनिवारी (दि. 16) 2 रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात आधार मिळाला आहे, अशी माहिती रक्तपेढीतून देण्यात आली.
खासगी रक्तपेढ्यांनाही जाणवतेय अडचण
चिंचवड येथील मोरया ब्लड बॅंकेचे संचालक प्रमोदकुमार सिंग यांनी रक्तपेढीत सर्वच रक्तगटांचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले. विविध महापुरुषांच्या जयंती सोहळ्यानिमित्त काही प्रमाणात रक्तदान शिबिर झाले. मात्र, मागणीच्या तुलनेत या शिबिरांतून जमा होणाऱ्या रक्त पिशव्यांचे प्रमाण कमी आहे. सध्या 30 ते 40 रक्तपिशव्या उपलब्ध आहेत, असे त्यांनी नमूद केले. भगवान महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती आदीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमुळे सध्या पिंपरी सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लडबॅंकेत सहा ते सात दिवस पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध आहे. मात्र, पुढील काळात रक्ताची चणचण जाणवणार आहे, असे ब्लड बॅंकेचे प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील यांनी सांगितले.
सध्या वायसीएम रक्तपेढीत दहा दिवस पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध आहे. महापुरुषांच्या जयंती निमित्त विविध रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याशिवाय, आवश्यकतेनुसार नियमित रक्तदान शिबिर घेण्यात येतात. रुग्णांना गरज भासल्यास खासगी रक्तपेढ्यांतूनही रक्त आणले जाते.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम.