प्रियदर्शिनी विद्यासंकुलात रंगल्या ‘चंद्रमोहन गप्पा’
नांदेड – जिथे भाषा समजायला मर्यादा येतात, तेव्हाच चित्रांचा जन्म होतो. त्यामुळे जगातील सर्वात महान गोष्ट म्हणून मला चित्रकलाच वाटते, असे मनस्पर्शित प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केले आहे. विमानतळानजीक असलेल्या प्रियदर्शिनी विद्यासंकुलाच्या रम्य परिसरात झालेल्या मुलाखतीत ते बोलत होते. साहित्यिक, कवी प्रा. पृथ्वीराज तौर व सुचिता खल्लाळ यांनी चंद्रमोहन यांच्याशी संवाद साधला.
आपल्या मुलाखतीदरम्यान चंद्रमोहन म्हणाले की, मी चित्रकार होणार असं मी शालेय जीवनापासूनच ठरवलं होतं. माझ्या आई-वडिलांनीही या गोष्टीला सक्रिय पाठिंबा दिला होता. मी चित्रकलेच्या क्षेत्रातच करियर करायचं ठरविलं; पण वडिलांनी याविषयी कधीही तक्रार केली नाही की नाराजी व्यक्त केली नाही. उलट प्रत्येकवेळी प्रोत्साहनच दिलं. माझं ७ वीर्पयंतचं शिक्षण ख्रिश्चन मिशनरी शाळेत झालं. त्यानंतर पुढचं शिक्षण पुण्यातच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालं.
चित्रकलेविषयी मुलांनी करियर करण्याविषयी पालकांच्या प्रतिक्रिया नाराजीच्याच असतात. या प्रश्नावर चंद्रमोहन म्हणाले की, खरेतर आपल्या घरात चित्रकार निर्माण होतो आहे, याचा आनंद झाला पाहिजे. एका अर्थाने आपण फार भित्र लोक आहोत. एखाद्या वेगळ्या क्षेत्रात करियर करायचं म्हटलं की, आपण मागेच हटतो. करियर म्हणजे पैसा एवढीच धारणा घट्ट झाली आहे; पण एखादं काम जीव लावून केलं की पैसाही मिळतो, हेही एक गणित मांडण्याची तयारी व्हायला हवी.
खरं पाहिलं तर चित्रकारितेतही चांगले पैसे मिळतात; पण त्यासाठी आपण किती चांगले चित्रकार आहोत हे स्वतःला आधी समजलं पाहिजे, असंही ते म्हणाले. चित्रकलेची सुरूवात तशी शालेय जीवनापासूनच झाली पाहिजे; पण सध्याची स्थिती पाहिली तर शालेय स्तरावर चित्रकला शिकविण्याचं चित्र फारच विदारक आहे. फाईन आर्ट, कमर्शियल आर्ट, परफॉर्मिंग आर्ट या चित्रकलेच्या वेगवेगळ्या शाखाही शालेय स्तरावर विद्याथ्र्यांना माहीत होत नाहीत. या शोकांतिकेला आपल्याकडची शिक्षणपद्धतीच जबाबदार आहे, असा आरोपही चंद्रमोहन यांनी यावेळी केला.
चित्रकलाच नव्हे तर जीवनाशी संबंधित सर्वच कलांची ओळख शालेय स्तरावर व्हायला हवी. आज आपल्याकडच्या आर्ट स्कूल ५० वषे मागे आहेत, असे सांगत चंद्रमोहन म्हणाले की, कमर्शियल आर्ट्सची आज मार्केटमध्ये किती गरज आहे, ते पाहता चित्रकलेला व चित्रकलेशी संबंधित शिक्षणाला प्राधान्य देणे नितांत गरजेचे आहे.
माणूस चित्रकार असलायलाच हवा असं नाही पण तो संवेदनशील निश्चित असावा, असं एका प्रश्नाच्या उत्तरात बोलतांना ते म्हणाले की, माझ्यातला चित्रकार २४ तास जागा असतो. एखाद्या कवितासंग्रहावर किंवा कथांच्या पुस्तकांचं मुखफष्ठ करतांना मला त्या कथावस्तुचं जेवढं आणि जितकं आकलन होतं तसं चित्र माझ्याकडून होतं. एखाद्या पुस्तकाचं मुखफष्ठ तयार करण्याआधी मी त्या पुस्तकाचं तीनवेळा वाचन करतो. माझी वाचनाची पद्धत थोडी वेगळी आहे. असं म्हणतात प्रत्येक पुस्तकाचा एका ‘जॉनर’ असतो, तो समजेर्पयंत मी ते पुस्तक वाचतच राहतो.
जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडं पाहण्याचा माझा वेगळा दृष्टीकोन असतो. सामान्य माणसं एखादी दररोज घडणारी, दिसणारी घटना सहजपणे पाहतात पण माझ्या नजरेला त्यात वेगवेगळ्या अनेक छटा दिसतात. यातूनच मी अनेक चित्रमालिका केल्या. शिवाय शेकडो शिल्पही केली.
साहित्यात बघायला गेलं तर समीक्षक मंडळी कथा, कविता आदींची समीक्षणं करतात पण चित्रकलेपासून कोसो दूर राहतात हे योग्य नाही. समीक्षकांसह लेखक आणि कवींची चित्रकला समजून घ्यायची जबाबदारी नाही का? असा प्रश्न करून त्यांनी चित्रकलेतही आकलन वाढवलं पाहिजे, असंही चंद्रमोहन यावेळी म्हणाले.
डॉ. पृथ्वीराज तौर आणि सुचिता खल्लाळ यांनी चित्रकलेशी संबंधित अत्यंत अभ्यासपूर्ण प्रश्न विचारून चंद्रमोहन यांच्याशी संवाद साधला. तब्बल दोन तास चाललेल्या या मुलाखतीत श्रोते तल्लीन होऊन ऐकत होते.
येथील प्रगल्भ साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शिनी विद्यासंकुलाचे चेअरमन बालासाहेब माधसवाड यांच्या सहकार्याने केले होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या पत्नी सौ. सरिता कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती.
बालासाहेब माधसवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले.कार्यक्रमास वसंत मैय्या, विलास ढवळे, डॉ. सुनील अवचार, संवेदी अवचार, गजानन सुरकुटवार, डॉ. गोविंद हंबडे, शिवाजी आंबुलगेकर, बळी आंबुलगेकर, संजीव मानकरी आदींसह श्रोतृवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.