नवी दिल्ली – दिल्ली आणि नजीकच्या परिसरात शेतकऱ्यांचे आंदोलन एक महिन्यापासून चालू आहे. त्यामुळे तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचे 70 हजार कोटी रुपयाचे नुकसान होणार असल्याचे मूल्यांकन पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेने केले आहे.
आंदोलनामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि लगतच्या भागातील पुरवठासाखळीवर परिणाम झाला आह.े चेंबरचे अध्यक्ष संजय अग्रवाल यांनी सांगितले की, शेतीच्या कामाबरोबरच रस्त्यावरील अडथळ्यामुळे इतर उद्योगांवरही परिणाम झाला आहे. पंजाब व हरियाना राज्यात सुमारे 25 लाख छोटे उद्योग कार्यरत आहेत.
या उद्योगामध्ये 45 लाख कर्मचारी काम करतात. पंजाब आणि हरियाणात छोट्या उद्योगातून 4 लाख कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यावर परिणाम झाला आहे. अन्न प्रक्रिया, कापड, वाहन, वाहनांचे सुटे भाग, शेतीसाठीची यंत्रसामग्री, व्यापार, पर्यटन इत्यादी क्षेत्रावर या आंदोलनामुळे परिणाम झाला. त्याचबरोबर विविध उद्योगाच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असल्याचे त्यांनी सांगितले.