सातारा -पाणी व स्वच्छता विभागातील राज्यभरातील कार्यरत जवळपास 1200 ते 1300 कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा 31 जुलैपासून समाप्त करत असल्याचे पत्र राज्य शासनाने आज काढले आहे. करोनाच्या संकटकाळात सेवा बजावताना अचानक घरी जाण्याचा आदेश काढून शासनाने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना संकटात टाकले.
पाणी व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक जिल्हा परिषद व तालुका पंचायत समितीच्या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी त्यांनी सेवा दिली आहे. करोना काळातही गावस्तरावर अनेक स्वच्छताविषयक जनजागृतीचे काम त्यांनी केले आहे. हे कर्मचारी 15 ते 17 वर्षांपासून सेवा देत आहेत.
त्यांना सुविधा देण्याऐवजी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे. यातील अनेक कर्मचारी वयाची चाळिशी पार केलेले आहेत. आऊटसोर्सिंग बंद करून सध्याच्या कर्मचाऱ्यांना कायम ठेवून मानधनात वाढ करून वयाच्या 58 वर्षांपर्यंत त्यांना नोकरीची हमी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.