यवत (वार्ताहर) – यवत (ता. दौंड) येथे पालखीतळामध्ये एका ४६ वर्षीय व्यक्तीचा अज्ञात इसमाने धारधार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना बुधवारी (दि. २७) सकाळी ११ वाजता घडली.
यवतमधील पालखी तळावरील शेडमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे परिसरातील नागरिकांना दिसून आले. त्यानंतर घटनेबाबत यवत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. मृत व्यक्तीच्या पोटावर धारधार शस्त्राने वार केल्याचे दिसत होते. दरम्यान, मृत युक्तीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे.
संजय सखाराम बनकर (वय ४६, रा. मुरारजी पेठ, चिंचनगर, सोलापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृतांची पत्नी मनीषा संजय बनकर (रा. खामगाव, तांबेवाडी, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मात्र, खुनामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पद्मराज गंपले, मदने सुजित जगताप यांनी भेट दिली. या खुनाबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.
राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस; NDRF व SDRF च्या 14 तुकड्या तैनात
पालखीतळाला लोखंडी गेट बसवण्याची मागणी
कोट्यवधी रुपये खर्चून यवत येथे पालखीतळ बांधण्यात आले आहे. पालखीच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी उपजिल्हाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली होती. भेटीनंतर यवत ग्रामस्थांनी त्यांना पालखीतळाला लोखंडी गेट बसवून बंदिस्त करण्याची मागणी केली होती. परंतु ही मागणी नुसती मागणीच राहिली असून, त्याची संबंधित विभागाने गाभीर्याने दखल घेतली नाही?असा सवालदेखील नागरिकांतुन उपस्थित केला जात आहे.