नगर – महाविकास आघाडी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या शिवभोजन थाळीद्वारे राज्यात गरिबांना 10 रुपयांत जेवण दिले जाते. करोनाकाळात हीच थाळी 5 रुपयांना दिली जात होती. मात्र, शहरासह जिल्ह्यातील केंद्रचालकांचे दोन महिन्यांचे सुमारे 85 लाख रुपयांची बिले थकल्याने केंद्र चालकांवरच उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात 42 शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवभोजनला मिळणार प्रतिसाद काहीसा अल्प झाल्याने तब्बल आठ केंद्र बंद पडली आहेत.
त्यामुळे आता केंद्रांची संख्या 42 वरून 34 वर आली आहे.
राज्य सरकारमध्ये होणाऱ्या बदलाचा फटका शिवभोजन थाळी चालकांना बसत असून शिवभोजन थाळी केंद्राची संख्या घटली आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी सुरू केली होती. सुरुवातीला लाभार्थींचा काही हजारांवर आकडा पोहोचला होता. जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांना एप्रिल 2023 पर्यंतचे अनुदान मिळाले आहे. जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रांची दरमहा अनुदानाची रक्कम सुमारे 40 लाखांच्या घरात जाते. मध्यंतरी केंद्रांच्या अनुदानाची रखडलेली रक्कमही मिळाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 26 जानेवारी 2020 रोजी गरिबांसाठी शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली.
त्यावेळी 700 दैनंदिन थाळ्या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आल्या होत्या. करोनाकाळात बिकट परिस्थिती लक्षात घेऊन तत्कालीन सरकारने जिल्ह्यासाठी 7500 दैनंदिन थाळ्या मंजूर केल्या होत्या. करोना काळ ओसरल्यानंतर जिल्ह्याचा इष्टांक कमी करून तो, सप्टेंबर 2021 पासून 4900 वर आणण्यात आला.
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्याचा हा इष्टांक आणखी कमी करून तो 4250 करण्यात आला. त्याचबरोबर या योजनेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ऑनलाइन नोंदणी, मोबाईल पचा वापर, जिओ फेन्सिंग पद्धती लागू करण्यात आल्या. जिल्ह्यात 41 शिवभोजन थाळी केंद्रे सुरू होती. त्यांना प्रत्येकी 75 ते 150 थाळींचा इष्टांक ठरवून दिला गेला आहे. गेल्या महिन्यात आणखी 3 केंद्रे वाढवण्यात आली. त्याचबरोबर जिल्ह्याचा इष्टांक 250 ने वाढवण्यात आला आहे.
मात्र ही केंद्रे अद्याप सुरू झालेली नाहीत. प्रति थाळीमागे ग्राहककडून 10 रुपये घेतले जातात.शासनाकडून शहरी व ग्रामीणसाठी वेगवेगळे अनुदान दिले जाते. शहरासाठी प्रत्येक थाळीमागे 40 तर ग्रामीणसाठी 25 रुपये अनुदान दिले जाते. शिवभोजन केंद्रावर 10 रुपयात लाभार्थींना 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅम एक वाटी भाजी, 10 ग्रॅम वाटीभर वरण आणि 150 ग्रॅम भात दिला जात आहे. लाभार्थी दुपारचे एक वेळचे जेवण करू शकतो. दुपारी 11 ते 3 या पाच तासात शिवभोजनाचा लाभ मिळतो.
आठ केंद्र झाली बंद
जिल्ह्यात संगमनेर, शेवगाव, जवळा, पारनेर, खर्डा, मिरजगाव, राहुरी व जामखेड अशी 8 शिवभोजन केंद्रे बंद करण्यात आली आहेत. यातील पारनेर, खर्डा व मिरजगाव येथील केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे तर इतर ठिकाणचे केंद्र प्रतिसादाअभावी बंद करण्यात झाली आहेत. याशिवाय अकोले, राहता व संगमनेर येथे प्रत्येकी एक केंद्र नव्याने मंजूर करण्यात आले आहेत. तेथे प्रत्येकी 75 शिवभोजन थाळी दैनंदिन मंजूर करण्यात आली आहे.