पिंपरी – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर रॅन्समवेअर हल्ला प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे? त्याबाबतचा सविस्तर अहवाल तीन दिवसांत सादर करावा, अशी नोटीस महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी टेक महिंद्रा लिमिटेड कंपनीला दिली आहे. खासदार श्रीरंग बारणे, नगरसेविका सीमा सावळे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांनी या प्रकरणात कारवाईची मागणी केली होती. अखेर आयुक्त राजेश पाटील यांनी त्याची दखल घेत टेक महिंद्रा कंपनीला नोटीस बजाविली आहे.
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कंपनीला दिलेल्या नोटीशीमध्ये म्हटले आहे की, या घटनेचे मूळ कारण काय ते स्पष्ट करावे. कंपनीचे काय निरीक्षण आहे ते मुद्देसूद सादर करण्यात यावे. आगामी काळात याचे काय परिणाम होणार त्याचा तपशीलही सादर करण्यात यावा. पुन्हा सर्व परिस्थिती पर्वपदावर कशी येणार ते कळवावे. आगामी काळात पुन्हा असा सायबर हल्ला झाला तर कोणती खबरदारी घेतली जाईल. या पुढे काय करणार आहात याचा अहवाल तीन दिवसांत द्यावा. तसेच या सायबर हल्ल्यात नेमके अर्थिक नुकसान कोणते, किती व कसे याचा तपशिल देण्यात यावा, असेही या नोटीशीमध्ये म्हटले आहे.
टेक महिंद्रा कंपनी आणि त्यांच्या क्रिस्टल इंटिग्रेटीड सर्व्हिस प्रा. लि. आणि आर्सेस इन्फोटेक प्रा. लि. या भागीदार कंपन्यांनी पाच वर्षांच्या काळात स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी आणि ऑपरेशनची जबाबदारी घेतली आहे. करारातील अटीशर्ती त्यांच्यावर बंधनकारक आहेत. प्रत्यक्षात सायबर हल्ल्यामुळे या अटीशर्तींचा भंग झाल्याचे प्रथमदर्शनी सिध्द झाले आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा लेखी खुलासा तीन दिवसांता द्यावा, असा आदेश आयुक्त पाटील यांनी दिला आहे.