– रंगनाथ कोकणे
एका ताज्या अहवालानुसार भारतामध्ये पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पक्ष्यांची संख्या कमी होणे हे एकप्रकारे देशांच्या समृद्ध जैवविविधतेवर हल्ला आहे.
“भारतातील पक्ष्यांची स्थिती-2023′ नामक अहवाल हा केवळ पक्ष्यांसाठीच नाही तर मानवासाठीही धोक्याची घंटा ठरणारी बाब आहे. गेल्या पंचवीस वर्षांत पक्ष्यांच्या विविध प्रजातींवर हल्ले झाले आहेत. अनेक प्रजाती लुप्त झाल्या तर काहींची संख्या बोटांवर मोजण्याइतपत राहिली आहे. पक्ष्यांवर घोंघावणारे संकट हे शिकारी लोकांपेक्षा विकासकामांच्या धडाक्यामुळे निर्माण झाले आहे. एकीकडे बदलणाऱ्या हवामानांमुळे पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झाला आहे. तसेच स्थलांतर आणि अधिवासाची विषम स्थिती ओढविली आहे. अधिक पीक घेण्याच्या आशेपोटी कीटकनाशकांचा अधिक मारा केला जात आहे. शिवाय विकासाच्या नावावर होणारी जंगलतोड, नैसर्गिक अधिवासांवर पडणारा हातोडा यामुळे पक्ष्यांच्या स्थितीत बदल पाहावयास मिळत आहे. अशी अनेक कारणे आहेत की त्यामुळे घरासमोरचा पक्ष्यांचा किलबिलाट कमी झाला आहे.
पक्ष्यांच्या अभ्यासासाठी हजारो पक्षीतज्ज्ञ आणि निसर्गप्रेमींनी जवळपास एक कोटी घटनांचे, बदलांचे आकलन करत अहवाल तयार केला आहे. यासाठी 942 प्रजातींच्या पक्ष्यांचे आकलन केले आहे. त्यापैकी 299 पक्ष्यांची खूपच कमी माहिती मिळाली. उर्वरित 643 प्रजातींच्या आकडेवारीनुसार 64 प्रकारचे पक्षी खूपच वेगाने कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचवेळी 78 प्रकारच्या प्रजातींची संख्या कमी झाली आहे. मात्र, एका आकडेवारीनुसार 189 प्रजातींचे पक्षी वाढत नसल्यामुळे लवकरच संकटात सापडू शकतात, अशी स्थिती आहे.
या अभ्यासात, रॅपटर्स म्हणजेच झडप घालून शिकार करणारे पक्षी देखील वेगाने कमी होत आहेत. यात पावशा (हॉक बर्ड), घुबड, गरूड यांचा उल्लेख करता येईल. शिवाय सागरीकिनाऱ्यावर असणारे पक्षी आणि बदकांची संख्या देखील भीषणरित्या कमी होत आहे. नदी, तलावांसारख्या भागात किनारपट्टीवर राहणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र आश्चर्यकारकरित्या आशियाई कोकिळांची संख्या वाढत चालली आहे. निलकंठ पक्ष्यासह चौदा पक्षी असे आहेत की त्यांना “आययूसीएन’ने लाल यादीत सामील करण्याची शिफारस केली. रेड लिस्टमध्ये लुप्त होणाऱ्या प्राण्यांना किंवा पक्ष्यांना ठेवण्यात येते.
जंगलात राहणारे पक्षी जसे सुतारपक्षी, पोपट, मैना, सुगरण, सातभाईच्या अनेक प्रजाती, चिपका आदींची संख्या कमी होण्यामागे घनदाट जंगलाचा अभाव हे महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे. शेतात आढळून येणारे बटेर (वर्तक), गवती लावा पक्षी कमी होण्यामागचे कारण म्हणजे पिकांवर कीटकनाशकांची अधिक फवारणी करणे. समुद्रकिनाऱ्यावर आढळून येणारे कंठेरी चिखल्या, काळा कस्तूर, बदक यांची संख्या वेगाने कमी होत आहे. यामागचे कारण म्हणजे किनाऱ्यावर, नदीकाठावर असणारे प्रदूषण, औद्योगिक घडामोडी आणि वाहतूक. ईशान्य भारतातील घनदाट जंगलातील वावरणाऱ्या पक्ष्यावर आलेले संकट तर चिंताजनकच आहे.
या ठिकाणी 66 पक्ष्यांच्या प्रजाती संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यापैकी 23 अरुणाचल प्रदेश, 22 आसाम, सात मणिपूर, तीन मेघालय, चार मिझोराम, पाच नागालॅंड आणि दोन जाती त्रिपुरातील आहेत. या ठिकाणी तर ग्रेट इंडियन बस्टर्डला तर आंतरराष्ट्रीय नैसर्गिक संरक्षण संघाने धोकादायक स्थितीतील पक्ष्यांच्या यादीत सामील केले आहे. 2011 मध्ये भारतीय उपखंडात ओसाड भागातील त्यांची संख्या 250 होती आणि ती 2018 पर्यंत 150 राहिली आहे. भारतात इंडियन बस्टर्डची संख्या राजस्थानात सर्वाधिक आढळून येते. कारण हा निर्जन, ओसाड भागातील पक्षी आहे. मात्र वाळवंटात सिंचनाचे क्षेत्र वाढल्याने त्याचे प्रमाण कमी होत गेले. आता नवीन अधिवासात रस्ते, कारखाने, ओसाड माळरानावर हिरवळ फुलविण्यासाठी घेतला जाणारा पुढाकार यामुळे या पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी जागाच राहिली नाही. एवढेच नाही तर जंगलात उच्चदाबाच्या वीज वाहिनीत अडकून देखील त्यांचे मृत्यू झाले आहेत.
कार्बेट फाउंडेशनने यासंदर्भात माहिती गोळा केली असून त्यानुसार बस्टर्डचा अधिवास आणि त्यांच्या प्रवास मार्गात मोठ्या प्रमाणात वीजतारा दिसतात. वजनदार असल्याने आणि फिरण्यासाठी कमी क्षेत्र राहिल्याने बस्टर्ड पक्ष्यांना वीज वाहिनीतून वाचताना अडचणी येतात आणि ते कधीकधी बळीही पडतात. हे एक उदाहरण आहे. याप्रमाणे अंदमान टील पक्षी किंवा कोकिळा किंवा चंबळ नदीच्या पाण्यात शिताफीने शिकार करणारा हिमालयीन पक्षी इंडियन स्किमर आणि नंतर महाधनेश हे सर्व पक्षी समाजात पसरलेल्या गैरसमजातून आणि अंधविश्वासामुळे शिकाऱ्यांकडून मारले जात आहेत. पालघाटच्या घनदाट जंगलात उंचीवर राहणारा प्रसिद्ध इंडियन ब्लू रॉबिन किंवा निलगिरी शोलाकिली पक्षी यांची संख्या वेगाने कमी होत आहे. त्यामुळे आगामी काळात हे पक्षी केवळ पुस्तकातच पाहावयास मिळतील, अशी भीती आहे.
बदलत्या हवामानामुळे एकीकडे दरवर्षी हिवाळ्यात येणारे स्थलांतरित पक्षी कमी होत चालले आहेत, तर दुसरीकडे वाढत्या उष्णतेमुळे पक्षी उंच ठिकाणी जात आहेत. अनेक वर्षांपासून असणारी झाडे विकासाच्या नावावर तोडली जात आहेत. दुसरीकडे कीटकनाशकांचा बेसुमार वापर होत असल्याने पक्ष्यांचे आवडते खाद्य किडे कमी होत आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे हवामान बदलाचा दुष्परिणाम म्हणजे पक्ष्यांत जीवघेणे आजार पसरत आहेत. संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. एक ताज्या अहवालानुसार सात टक्के पक्षी अशा आजारांमुळे अकाली मृत्युमुखी पडले आहेत. पवन ऊर्जेच्या पंख्यात अडकणे, हवाई सेवेच्या विस्तारांमुळे वाढलेली उड्डाणे, मोबाइल टॉवरच्या लहरी यामुळे पक्ष्यांचा विहार कमी होत आहे आणि त्यांची संख्या देखील कमी होत आहे. पक्ष्यांची संख्या कमी होणे हे एकप्रकारे देशांच्या समृद्ध जैवविविधतेवर हल्ला आहे.
एकीकडे पक्षी कमी होत आहे, तर दुसरीकडे त्यांचे अधिवास असलेल्या मोठ्या झाडावर मशिनरी फिरवली जात आहे. देशात केवळ जंगलाचे क्षेत्र कमी झाले नाही, तर भारतात आढळून येणाऱ्या एकूण 3708 प्रजातींपैकी 347 प्रजाती संकटात सापडले आहेत. “इस्रो’च्या डेटा बेस ट्रिझ ऑफ इंडिया यांच्या मते झाडांवर तर अधिक संकट आहे. अर्थात, ही झाडे पक्ष्यांसाठी राहण्याचे आवडते ठिकाण आणि आहाराचे माध्यम आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत पक्षी आहेत तोपर्यंत पृथ्वी ही माणसांसाठी लाभदायी आहे. हा एकप्रकारचा धर्म आहे, शास्त्र देखील. पृथ्वी वाचवायची असेल तर पक्ष्यांसाठी भोजन, आर्द्रता, जंगल, पाणी, अधिवासाची चिंता समाज आणि सरकार या दोघांनाही करावी लागेल.