– हेमंत महाजन
चीन तिबेटवर हक्क सांगत आहे. ड्रॅगनच्या विळख्यातून सुटला तरच तिबेटला स्वातंत्र्य उपभोगता येईल. सध्याची परिस्थिती पाहता तिबेटच्या स्वातंत्र्याची वाट खडतर दिसते.
नुकतीच दोन दिवसीय जागतिक बौद्ध परिषद पार पडली. या परिषदेच्या आयोजनाचे कर्तेपण भारताकडे होते. भारतीय सांस्कृतिक मंत्रालय व आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन यांनी एकत्रितरित्या या परिषदेचे आयोजन केले होते. जागतिक राजकारणात भारताच्या या आयोजनावर बरीच चर्चा झाली. आजच्या आधुनिक जगात अशा प्रकारच्या जागतिक बौद्ध परिषदेचे हे पहिलेच आयोजन ठरले. जगभरातील अनेक बौद्ध भिक्खू, तत्त्वज्ञ, अभ्यासक यांनी या परिषदेस हजेरी लावली. भगवान बुद्धांच्या शिकवणीचा प्रसार करण्यासाठी भारताने संपूर्ण समर्पण वृत्तीने आणि समर्पण भावनेने कार्य केले आहे. भारत आणि नेपाळमधील बुद्धिस्ट सर्किटचा विकास, सारनाथ आणि कुशीनगर येथील नूतनीकरण कार्य, कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या सहकार्याने लुंबिनी येथे भारत आंतरराष्ट्रीय बौद्ध वारसा आणि संस्कृती केंद्राची स्थापना अशी काही उदाहरणे आहेत.
भारताने राबवलेल्या शांतता मोहिमेचा आणि तुर्कीमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपासारख्या आपत्तीमध्ये मदतकार्यात भारताने केलेले प्रयत्न त्या दिशेने टाकलेले पाऊल होते. 20-21 एप्रिल रोजी दोन दिवसीय परिषद पार पडली. यात सुमारे 30 देशांचे प्रतिनिधी आणि परदेशातील सुमारे 180 प्रतिनिधी आणि भारतीय बौद्ध संघटनेचे 150 प्रतिनिधी सहभागी झाले. जागतिक बौद्ध समिटमध्ये सर्वात महत्त्वाची उपस्थिती होती, तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांची. अगोदर असे वाटत होते की चीनमुळे, त्यांना या परिषदेत उपस्थित राहण्याची परवानगी मिळणार नाही. मात्र, दलाई लामा यांनी या समिटमध्ये आपले विचार व्यक्त केले.
दलाई लामा यांनी सुमारे अर्धा तास चाललेल्या भाषणात सद्यपरिस्थितीच्या संदर्भात बौद्ध तत्त्वज्ञान आणि मूल्यांवर भर दिला. ते म्हणाले की, तिबेटमधील सध्याची परिस्थिती पाहण्यासाठी व्यापक मन आणि धैर्य लागते. बुद्धांच्या शिकवणीवर प्रकाश टाकताना तिबेटी नेत्याने सांगितले की, सर्वकाही परस्परावलंबी आहे. निसर्गात वेगळेपणा नाही. तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात समस्या असू शकतात ज्या कदाचित मोठ्या आणि अव्यवस्थापित वाटतील, पण त्यावर उपाय शोधता येतात. चीनने 7 ऑक्टोबर 1949 रोजी स्वतंत्र तिबेटवर आक्रमण केले. 17 मार्च 1959 रोजी दलाई लामा ल्हासाहून 60 हजार तिबेटींसोबत भारतात आले. दलाई लामा यांनी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळामध्ये आपले सरकार स्थापन केले. परंतु त्याला जगातील कुठल्याही राष्ट्राने मान्यता दिली नाही. चीनने तिबेटवर केलेल्या हल्ल्यात 10 लाखांहून अधिक तिबेटी मारले गेले. 1980, 1990 आणि 2008 या वर्षांमध्येही चीनविरुद्ध उठाव झाला होता; परंतु त्याला चिरडून टाकण्यात आले. जागतिक स्तरावर त्याची फारशी दखलही घेतली गेली नाही.
आज तिबेटवर चीन विविध प्रकारे आक्रमण करतो. एक आक्रमण म्हणजे सांस्कृतिक आक्रमण, मूळ तिबेट संस्कृतीला नष्ट करून चिनी संस्कृती रुजवायची. दुसरे आर्थिक आक्रमण, त्याप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणात खाणकाम सुरू आहे. तिबेटची अर्थव्यवस्था ही शेती, मेंढ्या पाळणे आणि पर्यटन यावर अवलंबून आहे.त्यामुळे इथल्या पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. तिसरे तिबेटचे पाणी पळवण्याचे कारस्थान. तिबेटमधील पाणी चीन आपल्या दुष्काळी भागाकडे वळवण्याचा प्रयत्न करतो आहे. तिबेटचे चिनीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. चिनी नागरिक तिबेटमध्ये राहायला जात आहेत. तिबेटची राजधानी ल्हासामध्ये 2 लाख चिनी आहेत आणि मूळ तिबेटन रहिवासी केवळ 1 लाखच आहेत.
आज चीन तिबेटमधील रहिवाशांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना चीन विरुद्ध आंदोलने करण्याची परवागनी नाही. जे चीन विरुद्ध बोलण्याचा, लिहिण्याचा प्रयत्न करतात त्यांना पकडून शिक्षा केली जाते. शाळेतील शिक्षक, धर्मगुरू, लेखक, आंदोलक, पर्यावरणवादी कार्यकर्ते, तिबेटविषयी चांगले लिहिणारे कवी, गायक या सर्वांवर लक्ष ठेवले जात आहे. तिबेटमध्ये चिनी सैनिकांची संख्याही लक्षणीय आहे. त्याशिवाय प्रत्येक 500 तिबेटीयन लोकांवर एक पोलीस कर्मचारी लक्ष ठेवून आहे. तरीही तिबेटी लोकांची आंदोलने सातत्याने सुरू असतात. त्यापैकी एक मोठा दुर्दैवी प्रकार म्हणजे स्वतःला जाळून घेणे. आतापर्यंत 180 तरुणांनी तिबेट स्वतंत्र व्हावा म्हणून आत्मदहन केले आहे.
तिबेटी भाषा वाढू नये यासाठी त्यावर बंदी आहे. तिबेटी गाणी, कविता, कथा यांच्यावर लक्ष ठेवले जाते. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांचा फोटो लावण्याची परवानगी नाही. 6 हजारांहून जास्त तिबेटी मॉन्सेन्ट्रीज नष्ट करण्यात आल्या आहेत.तिबेटी लोकांची संख्या वाढू नये म्हणून तिबेटी मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया लादली जाते. हजारो तिबेटी मुलींना परवानगी शिवाय या शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत. जे तिबेटी कार्यकर्ते रेझिस्टन्स चळवळीत भाग घेतात त्यांना राजकीय कैदी म्हणून अटक केली जाते आणि त्यांना विकासकामांमध्ये जबरदस्तीने मजुरी कामास ठेवले जाते किंवा चिनी सैन्याकरिता काम करण्यास भाग पाडले जाते. थोडक्यात, चीन तिबेटवर अनेक प्रकारे आक्रमण करत आहे. दलाई लामा यांच्या निवृत्तीनंतर पुढच्या दलाई लामावर चीनचे नियंत्रण राहण्याची शक्यता आहे. मात्र दलाई लामा यांनी एका मंगोलियन आठ वर्षांच्या मुलाला पुढचा दलाई लामा करण्याचे नियोजन केल्यामुळे, चीनच्या या कारस्थानावर पाणी फिरण्याची शक्यता आहे.
मात्र, काही तज्ज्ञांच्या मते शांततेच्या मार्गाने तिबेटी देत असलेला लढा, त्यांची सॉफ्टपॉवर, अध्यात्मिक शक्ती ही चीनमधील हुकूमशाहीपेक्षा अधिक परिणामकारक ठरू शकेल. जेव्हा सोव्हिएत रशिया फुटला, त्यावेळेला अशाप्रकारे देश वेगळे होतील अशी कल्पना कोणाच्याही मनात आली नसेल. त्यामुळे तिबेटी लोकांना असे वाटते की कधीतरी चीनच तुटेल आणि तिबेटला आपले स्वातंत्र्य मिळण्यास मदत मिळेल. भारतामध्ये झालेल्या दुसऱ्या बुद्धिस्ट समिटमुळे तिबेटी जनतेच्या समस्या सगळ्या जगाच्या समोर मांडण्यात आल्या आणि त्यामुळे चीनला थोडाफार शह देण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळालेले आहे. मात्र, तिबेटी स्वातंत्र्यलढ्याची वाट आजतरी बिकट दिसत आहे. त्यांना सगळ्या जगाने आणि भारतीयांनी मदत करण्याची गरज आहे.