हेमंत महाजन
इतके वर्षे प्रयत्न करूनसुद्धा फायर क्रेकर्स म्हणजे फटाके अजूनसुद्धा चीनमधून आयात केले जात आहेत. येणाऱ्या सणांमध्ये फटाक्यांची चीनमधून होणारी आयात थांबवण्याकरिता…
चीन गेले कित्येक वर्षे भारतामध्ये “इनफ्लुएन्स ऑपरेशन्स’ म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या भारतीयांना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यामुळे भारताची धोरणे ही चीनच्या बाजूने होतील आणि चीनला आर्थिक, सामरिक आणि इतर अनेक फायदे होतील. या विषयावर भारताच्या एका विचार मंचने (कायदा आणि समाज आघाडी) एक रिपोर्ट तयार केला आहे. हा रिपोर्ट ऑगस्ट महिन्यात प्रकाशित केला ज्याचे नाव आहे “मॅपिंग चायनीज फूट प्रिंट अँड इनफ्लुएन्स ऑपरेशन्स इंडिया’.
भारत सरकार चिनी इनफ्लुएन्स ऑपरेशन्सला प्रत्युत्तर देत आहे. परंतु जर चीनच्या अजून एका युद्धखोरीला प्रत्युत्तर द्यायचे असेल तर, या लढाईत प्रत्येक भारतीयाला भाग घ्यावा लागेल, केवळ भारत सरकार वर हे काम सोडून चालणार नाही. चिनी इनफ्लुएन्स ऑपरेशनचा उद्देश आहे, भारतातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये घुसायचे आणि त्यातून भारताच्या सामरिक क्षेत्रातील महत्त्वाची माहिती चोरी करायची.
चीनने भारताच्या उद्योग क्षेत्रात म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, तंत्रज्ञान क्षेत्रात, इनफ्लुएन्स ऑपरेशन्सचा वापर करून भारतीय उद्योजकांचे मत परिवर्तन केले आहे. भारतीय उद्योजकांना असे वाटते की, चीनशिवाय या क्षेत्रात प्रगती करणे शक्य नाही. 2015 पासून चीनने सात बिलियन डॉलर्स एवढी गुंतवणूक भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली आहे. भारतात जवळपास शंभर अँड्रॉइड ऍप्स वापरले जातात. त्यातील 44 हे चिनी आहेत. अशा महत्त्वाच्या क्षेत्रात चिनी घुसखोरी भारताकरिता धोकादायक आहे.
भारतात काम करणाऱ्या चिनी कंपन्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा प्रचंड गैरवापर केलेला आहे. उदाहरणार्थ, झियोमी ही चिनी कंपनी भारतात चीनच्या बाजूने मतपरिवर्तन करते. अँटीडंपिंग ड्युटीचा अर्थ होतो की, तयार करणाऱ्या किमतीपेक्षासुद्धा कमी किमतीत चीन माल भारताला विकतो. यामुळे भारतीय उद्योग, चीनशी स्पर्धा करू शकत नाही आणि भारतीय व्यापारी फक्त चिनी वस्तू विकत घेण्यावर आपले लक्ष केंद्रित करतात.
आपण अँटीडंपिंग ड्युटी कर पद्धतीचा वापर पद्धतशीरपणे करत नाही. अनेक चिनी वस्तूंवरती अँटीडंपिंग ड्युटी लावली जात नाही. जिथे ड्युटी लावली जाते, त्या वस्तूला चिनी व्यापारी जिथे ड्युटी नाही, त्या वर्गामध्ये बदली करतात. यावरती सरकारी संस्थांचे पुरेसे लक्ष नाही.
चिनी वस्तूंचे भारतात प्रचंड प्रमाणामध्ये स्मगलिंग केले जाते किंवा बेकायदेशीररित्या आयात केली जाते. दरवर्षी एक हजार ते पंधराशे कोटी रुपयांचा माल पकडला जातो. अर्थातच प्रत्यक्ष तस्करी किंवा बेकायदेशीर व्यापार हा पकडल्या गेलेल्या मालाच्या कितीतरी जास्त पट आहे. भारताचे मुख्य अँटी तस्करी संस्था म्हणजे डायरेक्टरेट ऑफ रेव्ह्यू इंटेलिजन्सची क्षमता, अनेक पटींनी वाढली पाहिजे.
छोटे आणि मध्यम दर्जाच्या उद्योजकांना चीनशी स्पर्धा करण्याकरता अजून मदतीची गरज आहे. ज्या वस्तू भारतात बनतात, त्या चीनमधून आयात करण्यात अर्थ नाही. परंतु अनेक भारतीय व्यापारी त्या वस्तू स्वस्त असतात म्हणून आयात करतात. अर्थात, यावरती सर्वात जास्त इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आयात कर लावायला पाहिजे, ज्यामुळे आपल्या उद्योजकांना चिनी मालाशी स्पर्धा करणे शक्य होईल. जिथे केवळ कच्चा माल आयात केला जातो त्यावरती कमी कर लावला जावा ज्यामुळे आपण तयार उत्पादन कमी किमतीत निर्माण करू शकू.
औषधी क्षेत्रांमध्ये आपण कच्च्या मालाकरता चीन वरती 90 टक्के अवलंबून आहोत. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज आहे, ज्यामुळे कच्चा माल हा आपण भारतात निर्मीत करू शकू. त्याशिवाय चीनवरचे औषधी क्षेत्रात असलेले आपले अवलंबित्व कमी होणार नाही.
भारताच्या सोलर मिशनची 84 टक्के आयात चीनमधून केली जाते. कारण किंमत खूप कमी आहे. म्हणूनच चिनी सोलर पॅनल वरती अँटीडंपिंग ड्युटी लावणे गरजेचे आहे. चीनमधून येणाऱ्या वस्तूंवरती आयात कर, जीएसटी, टेक्सटाइल इंडस्ट्री किंवा कापड निर्याती क्षेत्रात चीन वेगळ्या पद्धतीने भारतात घुसखोरी करत आहे. चिनी माल बांगलादेशमधून तयार होऊन, स्वस्त दरात भारतामध्ये निर्यात केला जात आहेत. म्हणून चिनी माल जो दुसऱ्या देशांमधून भारतात प्रवेश करतो, त्यावरसुद्धा आणखी ड्युटी लावण्याची गरज आहे.
गेली कित्येक वर्षे चीनमधून फायर क्रेकर्स म्हणजे फटाके आयात केले जात आहेत. चिनी फटाके न वापरण्यासाठी अनेक प्रयत्न करूनसुद्धा फारसा फरक पडला नाही. पुढे येणाऱ्या सणांमध्ये चीनमधून होणारी फटाक्यांची आयात थांबवण्याकरिता चिनी फटाक्यांवरती 18 टक्के जीएसटी लावणे गरजेचे आहे.
भारताच्या वेगवेगळ्या उद्योजक क्षेत्रांमध्ये भारतीयांच्या मनावरती परिणाम करून आणि वेगवेगळ्या युक्त्या वापरून चिनी निर्यात भारतामध्ये वाढली आहे. चीनच्या इनफ्लुएन्स ऑपरेशन्सला बळी न पडता आपण चीनमधून येणाऱ्या वस्तूंवरती आयात कर वाढवला पाहिजे. नाहीतर भारतातील उद्योकजगतात झालेली चिनी घुसखोरी थांबवण्यात आपल्याला यश मिळणार नाही.
पुन्हा एकदा दिवाळी, दसरा आणि इतर सणांआधी प्रत्येक भारतीयाने मी कुठलीही चिनी वस्तू विकत घेणार नाही, असे ठरविले पाहिजे. जर सगळे भारतीय एकत्र आलो तरच आपण चिनी घुसखोरीला थांबवू शकतो. सर्वात महत्त्वाचे आहे की, प्रत्येक क्षेत्रातील भारतीयाला स्वतःमध्येच विश्वास असणे गरजेचे आहे की, आम्ही कुठल्याही क्षेत्रात जागतिक दर्जाचे असून चीनला प्रत्युत्तर देऊ शकतो. तरच आपण उद्योजक क्षेत्रांत चिनी इनफ्लुएन्स ऑपरेशन्स व आर्थिक आक्रमण थांबवू शकतो.