– आरिफ शेख
पाकिस्तान आणि इराणच्या परस्परांवरील हल्ल्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. इराणच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान हा दक्षिण आशियायी देशांत एकाकी पडल्याचे स्पष्ट झाले. फक्त चीनचाच काय तो अपवाद.
पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून विविध अंतर्गत समस्यांचा बळी ठरला आहे. देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था, राजकीय अस्थिरता आणि वाढत्या अतिरेकी घटनांनी पाकिस्तानला अनेक आघाड्यांवर अडकवले आहे. अशा स्थितीत इराणसोबतचा अलीकडचा तणाव हा पाकिस्तानसाठी अडचणीचा ठरत असतानाच, दोन्ही देशांमधील ‘बंधुत्वाच्या’ संबंधांनाही हा मोठा धक्का मानला जात आहे. पाकिस्तानचे पूर्व आणि पश्चिम शेजारी भारत आणि अफगाणिस्तान यांच्याशी संबंध आधीच तणावपूर्ण आहेत आणि अशा परिस्थितीत इराणशी उडालेल्या संघर्षामुळे या प्रदेशात राजनैतिक आणि भौगोलिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले जात आहे. 16 जानेवारीच्या रात्री इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ‘सब्ज कोह’ भागात ‘जैश-अल-अदल’ या अतिरेकी संघटनेच्या कथित अड्ड्यांवर हवाई हल्ला केला. त्यात दोन मुलांचा मृत्यू झाला तर तीन मुली जखमी झाल्या. इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानने गुरुवारी सकाळी इराणच्या सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतातील कथित अतिरेक्यांच्या लपलेल्या ठिकाणांना लक्ष्य केले. त्यात नऊ जण ठार झाले.
पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती पाहिली तर, पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांना अवघे दोन आठवडे उरले आहेत. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी मित्र देशांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी देशाला मुदतवाढ देण्याची विनंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान आणि इराणमधील अलीकडच्या तणावानंतर एक मत तयार होत आहे, की अंतर्गत समस्यांमुळे पाकिस्तान आता भारत, अफगाणिस्तान आणि इराण या तीन शेजारी देशांशी सीमेवर संघर्ष करत आहे. पाकिस्तानी लष्कर आधीच देशातील अनेक अतिरेकी आणि बंडखोर गटांशी लढत आहे आणि अशा परिस्थितीत इराणकडून होणार्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेवर दबाव वाढला आहे. या स्थितीत प्रश्न असा पडतो की पाकिस्तानच्या तीन शेजारी देशांसोबतच्या तणावाची कारणे काय आहेत?
हे पाकिस्तानच्या भौगोलिक आणि सुरक्षा परिस्थितीमुळे होत आहे की आंतरराष्ट्रीय शक्तींच्या भूमिकेमुळे? प्रादेशिक पातळीवर पाकिस्तान एकाकी पडत आहे का? पाकिस्तान आणि इराणमधील अलीकडील तणाव भूराजकीय पार्श्वभूमीवर पाहिला पाहिजे. गेल्या तीन-चार दशकांपासून हा प्रदेश हादरला आहे. आधी रशिया आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध झाले, नंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात कारवाया केल्या आणि आता या भागावर अतिरेकी प्रभाव पडला आहे. पाकिस्तान हा या भागातील एकमेव अणुशक्ती असलेला देश आहे. पाकिस्तानचे चीन, इराण आणि अफगाणिस्तानशी त्यांचे नेहमीच ऐतिहासिक आणि दीर्घकालीन संबंध राहिले आहेत.
भारताशी संबंधांमध्ये तणावाचे कारण काश्मीरमधील वर्चस्व हे आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंधांना मोठा इतिहास आहे आणि गेल्या सात दशकांमध्ये त्यात चढ-उतार आले आहेत. या काळात पाकिस्तानने भारतासोबत तीन युद्धे केली आणि या तीनही युद्धात त्याला पराभव पत्करावा लागला. प्रॉक्सी वारमध्येही पाकिस्तानला नामोहरम व्हावे लागले आहे. इराणबरोबरची अलीकडील तणावाची परिस्थिती नवीन नाही. ती 70च्या दशकापासून सुरू आहे आणि पाकिस्तान आणि इराणमध्ये एक संयुक्त प्रक्रियादेखील ठरविण्यात आली होती, ज्या अंतर्गत 2012 मध्ये ‘जैश-अल-अदल’ नष्ट करण्यात आले होते. लोकांना ताब्यात देण्यात आले होते. पाकिस्तान आणि इराणमधील सीमा समस्यांव्यतिरिक्त धार्मिक गटांमुळेही काही समस्या निर्माण झाल्या आहेत; परंतु पाकिस्तान आणि इराणने नेहमीच संवादाद्वारे त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. इराणसोबतच्या अलीकडच्या तणावाचे कारणही इराणमध्ये सापडले आहे.
चाबहारमध्ये पाकिस्तानी शिष्टमंडळ उपस्थित असताना हा प्रकार घडला. पाकिस्तानने अफगाणिस्तान आणि इराण या दोन्ही देशांबाबत नेहमीच धोरणात्मक संयम दाखवला आहे. पाकिस्तानने इराण आणि अफगाणिस्तानशी संबंध एका मर्यादेपलीकडे कधीही बिघडू दिले नाहीत. पाकिस्तानी लोकांचे मत आहे, की भारतात निवडणुका झाल्या की पाकिस्तानच्या सीमेवर कोणतीही आक्रमक कारवाई करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे पाकिस्तानने इराणवर केलेल्या प्रत्युत्तरादाखल हल्ला हा केवळ इराणलाच नव्हे, तर भारतालाही संदेश देणारा होता की, त्यांनी कोणत्याही दुःसाहसा’चा विचार करू नये. तीन शेजारी देशांसोबत नाकेबंदी करण्याचा पाकिस्तानचा विचार चुकीचा आहे आणि तेहरानसोबत सुरू असलेला तणावही कमी होत आहे. पाकिस्तानच्या इराणशी सीमा व्यवस्थापनाच्या काही समस्या होत्या, त्या आता वाढल्या आहेत. इराणने जे केले ते चुकीचे होते.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या निवेदनात हे स्पष्ट झाले आहे, की ते प्रकरण सोडवण्याच्या दिशेने वाटचाल करू इच्छित आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अहवालात असे म्हटले आहे की अफगाणिस्तानमध्ये सुमारे आठ ते दहा हजार दहशतवादी आहेत. ते पाकिस्तान, चीन, रशिया आणि इराणसह इतर देशांविरुद्धच्या कारवायांमध्ये सामील आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाद हा केवळ सुरक्षेशी संबंधित आहे आणि पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या भूमीतून पाकिस्तानविरोधात केल्या जाणार्या कारवायांबाबत अनेकदा आवाज उठवला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ऐतिहासिक, व्यापारी आणि राजनैतिक संबंध आहेत. गेल्या तीन दशकांपासून लाखो अफगाण निर्वासित पाकिस्तानात राहत आहेत;
परंतु 2000च्या दशकात अमेरिकेने अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण बनले. लाखो अफगाण निर्वासितांना त्यांच्या देशात परत पाठविण्याच्या पाकिस्तान सरकारने नुकत्याच केलेल्या घोषणेनंतरही दोन्ही सरकारांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानला नेहमीच मदत केली आहे. मग तो लाखो निर्वासितांना आश्रय देत असेल किंवा आर्थिक मदत करत असेल.
अनेक बलुच फुटीरतावादी संघटना सक्रिय आहेत. त्या फुटीरतावादी संघटनांशी संबंधित अतिरेकी इराणमध्ये आश्रय घेत असल्याचा दावा पाकिस्तानी अधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून करत होते. हा केवळ इराण आणि पाकिस्तानचाच मुद्दा नाही तर पूर्वेकडील ‘सीपीईसी’(सी-पेक) कॉरिडॉर योजनेवर हल्ल्याचा कटदेखील आहे. पाकिस्तानमधील विश्लेषक मानतात, की चीन, भारत, इराण आणि अफगाणिस्तान हे चार शेजारी आहेत. चीनसोबतचे संबंध खूप चांगले आहेत. इराण आणि अफगाणिस्तानच्या संबंधांमधील अविश्वासाचे वातावरण संपवून पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण तसेच या क्षेत्रासाठी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न असायला हवा. पाकिस्तानने चीन, रशिया, तुर्कस्तान, कतार आणि सौदी अरेबियाशी चर्चा केली पाहिजे,
कारण हे देश इराण आणि अफगाणिस्तानच्याही जवळ आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रादेशिक मुत्सद्देगिरीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून स्थिर शांतता प्रस्थापित होईल. भारतासोबतची सीमा शांततापूर्ण असली, तरी तेथील संबंध अतिशय बिघडले आहेत. आगामी काळात इराण आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये चीनच्या भूमिकेचे महत्त्व वाढणार आहे. चीनने पाकिस्तान आणि इराण या दोन्ही देशांमध्ये प्रचंड भांडवल गुंतवले आहे आणि या प्रदेशात अस्थिरता निर्माण होऊ नये अशी चीनची इच्छा आहे, म्हणूनच त्याने मध्यस्थीची ऑफर दिली आहे.