जालना – मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर सुरू असलेले आंदोलन शमवण्यासाठी न्या. शिंदे समितीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने मंगळवारी घेतला. मात्र, उपोषणावर असलेल्या मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil)यांनी सरकारचा निर्णय अमान्य असल्याचे म्हटले आहे. “सरकारने घेतलेला आजचा एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही आणि वाटू देणार नाहीत. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा. सरकारने पावले न उचलल्यास उद्यापासून पाणी घेणेही बंद करू, व पुढील परिणामाला सरकार (Shinde Fadanvis Sarkar) जबाबदार असेल,’ असा सज्जड इशारा जरांगे यांनी यावेळी बोलताना सरकारला दिला आहे.
तसेच, बीडमधील हिंसाचार प्रकरणी निर्दोष मराठा युवकांना अटक करण्यात आली असून ही दडपशाही बंद करावी असा इशाराही जरांगे यांनी मंगळवारी आंतरवाली सराटीमध्ये उपोषण स्थळावरून माध्यमांशी संवाद साधताना दिला आहे. बीडमधील हिंसाचारानंतर पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांनी निर्दोष, गरीब मराठा युवकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बीड पोलिसांनी ही कारवाई ताबडतोब बंद करावे. बीडमधील पोरांवर गुन्हे दाखल केले तर मी बीडमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाला बसेल. त्यावेळी पाच लाख येतील, अथवा 10 लाख आंदोलक आले तर मला त्याची काळजी नाही, असा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्रातील कोणत्याही आंदोलकाला त्रास दिला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही असेही त्यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस टार्गेट
“त्यांना आयुष्यात दुसरं काय आलं? घरं कोणी जाळले आम्हाला माहिती नाही, भाजप तुमच्यामुळेच संपायला आलंय, आमच्या पैशावर बासुंदी, गुलाबजामुन खाल्ले, करा काय करायचे ते, तुम्ही किती ताकतवर आहात ते दाखवाच. किती 307 गुन्हे दाखल करायचे ते करा?’ असे म्हणत जरांगेंनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना (Devendra fadanvis) थेट इशारा दिला आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
अगोदर आमचे आंदोलन नंतर तुमची संचारबंदी
आम्ही 50 टक्के आहोत, बौद्ध, मुस्लिम, धनगर समाजाचा आम्हाला पाठिंबा
37 टक्के लोकसंख्येला 30 टक्के आरक्षण असतं का?
बीडचे जिल्हाधिकारी हे जातीयवादी आहेत
शेती शब्दाची लाज वाटण्याइतके मराठे खालच्या विचाराचे नाहीत.
ज्यांना कुणबी प्रमाणपत्र नको, त्यांना प्रमाणपत्राची जबरदस्ती नाही.
राजीनामा देणाऱ्या मराठा आमदारांचे योगदान समाज विसरणार नाही.