वाघोली, (प्रतिनिधी)- खाण व क्रशरमधून उडणार्या धुळीवर नियंत्रण न मिळविणार्या आस्थपनांचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय लोणीकंदच्या विशेष ग्रामसभेत घेण्यात आला. तसेच नियम मोडणार्यांवर दंड आकारण्याचा निर्णयही घेण्यात आला.
लोणीकंद येथील खाण व क्रशर उद्योगापासून निर्माण होणार्या धुळीने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी रस्ता खोदून ही वाहतूक रोखत काही दिवसापूर्वी आंदोलन केले होते. खाण व क्रशर उद्योगाला नोटीसद्वारे नियम पाळण्याबाबत ग्रामपंचायतीने सूचना दिल्या होत्या; मात्र धुळीचे प्रमाण कमी होतच नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते.
याबाबत ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा बोलविण्यात आली होती. या ग्रामसभेत या उद्योगांना नियम व अटी घालून देण्यात आल्या. जो या नियम व अटी पाळणार नाहीत, त्यांच्याकडून दंड आकारण्यात येणार आहे. नियम पाळले जातात की नाही हे पाहण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती या सर्व नियम अटी पाळल्या जातात की नाही याची पाहणी करणार आहे.