मुंबई – मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारच्या भूमिकेत सुरुवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली. काही ठोस नियोजन आहे की नाही हे मला सरकारला विचारायचे आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांनी सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षण प्रश्न सोडवावा, असे देखील आवाहन केले.
उच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक मागास असे सिद्ध केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली होती. आता 15 ते 25 मार्च दरम्यान सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात अंतिम सुनावणी होणार आहे. सरकारच्या भूमिकेत सुरुवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली? काही ठोस नियोजन आहे की नाही, असा सवाल संभाजीराजे यांनी यावेळी बोलताना सरकारला केला आहे. दरम्यान, सत्तेत बसणारे ज्या भावनेने निवडून येतात त्या भावनेला त्यांनी न्याय द्यावा, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर श्वेतपत्रिका काढावी, या मागणीचा पुनरुच्चार उदयनराजे यांनी केला. गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजेंनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटी दिल्या. मराठा आरक्षण हाच मुख्य मुद्दा या भेटींमागील होता. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नसल्याची खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उच्च न्यायालायने मराठा समाजाला सामाजिक मागास असे सिद्ध केल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली होती. आता 15 ते 25 मार्चला अंतिम सुनावणी होणार आहे. मी 2007 पासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. 2013 ला आझाद मैदानात माझ्या नेतृत्वात मोर्चा काढला होता. तेव्हा नारायण राणे समितीने दिलेले आरक्षण टिकले नाही. त्यानंतर 2017 ला देखील मुंबईत जो महामोर्चा निघाला होता, तेव्हा मला व्यासपीठावर जावे लागले होते. पण, सरकारच्या भूमिकेत सुरुवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली? काही ठोस नियोजन आहे की नाही हे मला सरकारला विचारायचं आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील काही दिवसांपूर्वी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले होते. मागील काही दिवसांपासून आरक्षणासंदर्भात विविध नेत्यांच्या भेटी घेत असलेल्या उदयनराजे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात. आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या, अन्यथा विष पिऊन मरू द्या, असा गर्भित इशारा मराठा आरक्षण चळवळीचे मुख्य प्रवर्तक खा. उदयनराजे भोसले यांनी दिला होता.