अबुजा (नायजेरिया) – गेल्या वर्षी नायजेरियातील इक्विटोरियल गिमियामधून ताब्यात घेतलेल्या आणि नंतर नायजेरियामध्ये नेण्यात आलेल्या 16 भारतीय खलाशांची सुटका करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आल्यानंतर तब्बल 16 महिन्यांनंतर या खलाशांना सोडून देण्यात आले आहे.
सागरी वाहतुकीदरम्यान सतर्कता बाळगावी आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असे या खलाशांना बजावण्यात आले आहे. नायजेरियाच्या नौदलाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. सोमवारी या खलाशांना त्यांची कागदपत्रे देण्यात आली.
हेरोइक आयडन या तेलवाहू टॅंकरला नाययजेरियाच्या सागरी हद्दीत असताना ताब्यात घेण्यात आले होते. या टॅंकरवर 26 विदेशी खलासी होते. त्यामध्ये 16 भारतीय खलाशी होते. नायजेरियातून तेलाचा साठा ताब्यात घेण्यासाठी वाट बघत असताना नायजेरियाच्या नौदलाची नौका असल्याचे सांगून अज्ञात सुरक्षा रक्षकांनी या सर्व खलाशांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ताब्यात घेतले होते. सागरी चाच्यांची ही खेळी असल्याचा संशय होता. नंतर हे सागरी चाचे नसून इक्विटोरियल गिनियाच्या नौदलाचे रक्षक असल्याचे सांगण्यात आले होते.
नायजेरियातील न्यायालयात या टॅंकरवर खटला चालवला गेला. तेंव्हा सागरी हद्दीत घुसल्याबद्दल खलाशांनी माफी मागितली. नायजेरियाच्या सागरी सुरक्षा दलांना सागरी चचाचे संबोधून खोटा इशारा देण्याबद्दलही माफी मागितली गेली. त्यानंतर खलाशांना इशारा देऊन सोडून देण्यात आले.